मालवण (प्रतिनिधी)- आपण भारतीय आहोत तर मानवता हा आपला धर्म आहे. यासाठी जात, धर्म व प्रांतिक अस्मिता विसर्जित केली पाहिजे. समाजाला एकत्र आणण्यासाठी, जातींचे पाश तोडण्यासाठी महापुरुषांच्या संयुक्त जयंती सारखे उपक्रम राबविले गेले पाहिजेत, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मालवण येथे बोलताना केले. फुले शाहू आंबेडकर विचारमंच मालवण यांच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांचा संयुक्त जयंती महोत्सव मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात संपन्न झाला. यावेळी प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विचारमंचावर संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष सुधीरराजे भोसले, कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष आनंद मालवणकर, वामन खोत, डॉ. दत्ता जाधव, विचारमंचच्या मालवण महिला अध्यक्ष नेहा तांबे आदी उपस्थित होते.
यावेळी विचारमंचचे सचिव रंजन तांबे यांनी प्रास्ताविक करत विचारमंचच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी प्रवीण गायकवाड, सुधीरराजे भोसले यांच्यासह मान्यवरांचा मिलिंद जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या बाबू देवगडकर, राजेंद्र कदम, प्रा. कैलास राबते, महेंद्र मालवणकर, महेश कोळंबकर, सिद्धी जाधव, प्रा. नागेश कदम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रवीण गायकवाड म्हणाले, महात्मा फुले यांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज होते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श महात्मा फुले होते. महापुरुषांमधील हा विचारांचा धागा आपण समजून घेतला पाहिजे. महात्मा फुले यांनीच शिवरायांच्या समाधीचा शोध लावून शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली. भारतात त्याकाळी स्वातंत्र्य लढ्याबरोबरच सामाजिक न्यायाचा लढा सुरु होता आणि हा लढा महात्मा फुले यांनी सुरु केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श महात्मा फुले होते. तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी महात्मा फुलेंचा विचार पुढे नेला. या महापुरुषांनी लोकांना समजकारणाच्या अंधःकारातून बाहेर काढले, मात्र आज लोक अर्थकारणाच्या अंधःकारात लोटली जात आहेत. आपल्याच कष्टाने हा देश स्वातंत्र्य झाला तर आज आपणच आर्थिक अडचणीत का सापडलो आहोत, याचा विचार करून बहुजन समाजाला आर्थिक क्रांतीकडे नेण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असेही श्री. गायकवाड म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद जाधव यांनी फुले शाहू विचारमंचच्या कार्याचा आढावा घेतानाच फुले- आंबेडकर संयुक्त जयंती कार्यक्रमातून त्यांचे विचार समाजात रुजविण्याचे कार्य आम्ही करत आहोत, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर समाजात प्रबोधनाचे काम झाले पाहिजे असे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. कैलास राबते यांनी केले. आभार विलास देऊलकर यांनी मानले. त्यानंतर चैत्राली प्रॉडक्शन तर्फे स्वाती राजेंद्र कदम निर्मित राजेंद्र कदम यांचा माझी भीमशाही हा ऑर्केस्ट्रा सादर झाला. यावेळी मारुती सोनवडेकर, अजित जाधव, राजू कदम, प्रा. देविदास हारगिले, अशोक तांबे, रवींद्र मालवणकर, महेश कोळंबकर, दत्तात्रय जाधव, संजय जाधव, माधुरी जाधव, आनंद सावळ, प्रतिभा मालवणकर, हेमंत वायंगणकर आदी व इतर उपस्थित होते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.