loader
Breaking News
Breaking News
Foto

वर्षा'वर मेजवान्या आणि कोकणी शेतकऱ्याच्या पदरात फक्त २२० रुपये? राजू शेट्टींचा राज्य सरकारला थेट इशारा

रत्नागिरी: कोकणचा हापूस आंबा आज जगाच्या जिभेवर रेंगाळतोय आणि देशाला वार्षिक १३०० कोटींचे परकीय चलन मिळवून देतोय. मात्र, ज्या शेतकऱ्याच्या रक्ताचं पाणी करून हे पीक उभं राहतं, तोच शेतकरी आज निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि सरकारच्या बेदखल वृत्तीमुळे कंगाल झाला आहे. निसर्गावर धनिकांनी केलेल्या आक्रमणामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून त्याचा थेट फटका शेती उत्पादनाला बसला आहे. खर्च होऊनही उत्पादन केवळ ५ ते १० टक्क्यांवर आले असताना, शासन मात्र मदतीचा हात देण्याऐवजी शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. कंत्राटदारांच्या फायद्यासाठी सरकारी तिजोरीवर दरोडा टाकला जात आहे, असा घणाघात करत शेट्टी म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गासाठी १ लाख कोटी रुपये खर्च करायला सरकारकडे पैसे आहेत, मात्र कोकणातील आंबा उत्पादकांसाठी यांच्याकडे काहीच नाही. वर्षा बंगल्यावर दररोज मेजवान्या झडतात आणि कोकणातील शेतकऱ्याला मदत म्हणून केवळ २२० रुपये दिले जातात, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. आम्ही सरकारकडे भीक मागत नाही आहोत, उलट आजवर आम्हीच सरकारला भरभरून दिले आहे. आता शेतकऱ्याच्या संयमाचा अंत झाला असून, मदतीसाठी केंद्राकडे बोट दाखवणाऱ्या राज्य सरकारने ही जबाबदारी झटकू नये.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींवरही कडाडून टीका केली. ज्यावेळी २२० रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर झाली, तेव्हा कोकणातील लोकप्रतिनिधी झोपले होते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बंगले आणि नवनवीन गाड्या घेण्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत, मग आंबा उत्पादक अडचणीत असताना हे गप्प का? कोकणाला बेदखल करणाऱ्या राज्यकर्त्यांना आता जाब विचारण्याची वेळ आली आहे. जर सरकारने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर कोकणातील यांची राजवट उध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. हापूस आंब्याची विश्वासार्हता टिकवण्यासाठीही त्यांनी कडक भूमिका मांडली. बाहेरचा आंबा कोकणात आणून विकला जात असेल, तर त्याला 'अभिषेक' घालावा लागेल, कारण एकदा चवीची फसवणूक झाली की हापूसवरील जगाचा विश्वास उडेल. तसेच, ज्या शेतकऱ्यांनी आंबा आणि काजूवर कर्ज घेतले आहे आणि जे सध्या थकीत आहे, ते कर्ज सरकारने त्वरित माफ करावे. ही मागणी मान्य न झाल्यास शेतकऱ्यांना रान उठवावे लागेल आणि आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागेल.

टाईम्स स्पेशल

शेवटी, सरकारला अल्टिमेटम देताना राजू शेट्टी यांनी 'वर्षा' बंगल्यावर धडक देण्याचे संकेत दिले. १५ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या मानगुटीवर बसल्याशिवाय आणि त्यांना जाब विचारल्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही. हे आंदोलन कोणत्या एका पक्षाचे नसून सर्व शेतकऱ्यांचे आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. जर सरकारने आपली भूमिका बदलली नाही, तर १५ मे ला थेट 'वर्षा'वर घुसण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg