loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण आणि दुपदरीकरणाबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट

रत्नागिरी : कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे आणि मार्गाचे दुपदरीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे, या मागणीबाबत केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी खासदार रवींद्र वायकर यांना पाठवलेल्या पत्रात या दोन्ही महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती दिली असून, विलीनीकरणाचा निर्णय सर्वस्वी राज्य सरकारांच्या संमतीवर अवलंबून असल्याचे म्हटले आहे. ​खासदार रवींद्र वायकर यांनी लोकसभा अधिवेशनात नियम ३७७ अंतर्गत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (KRCL) भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याचा आणि प्रलंबित दुपदरीकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना केंद्र सरकारने सांगितले की, कोकण रेल्वेची स्थापना १९९० मध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या राज्यांच्या भागीदारीतून झाली होती. सध्या या कॉर्पोरेशनमध्ये केंद्र सरकारचा (रेल्वे मंत्रालय) वाटा ६६.३५% असून उर्वरित हिस्सा राज्यांचा आहे. यामध्ये महाराष्ट्र सरकारची १५.११%, कर्नाटकची १०.३०% आणि गोवा व केरळ सरकारची प्रत्येकी ४.१२% भागीदारी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​विलीनीकरणाबाबत स्पष्टीकरण देताना मंत्र्यांनी सांगितले की, कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करायचे असल्यास ज्या ज्या राज्यांची यात भागीदारी आहे, त्या सर्व राज्य सरकारांची संमती मिळणे अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत सर्व भागधारक राज्ये या प्रस्तावावर सहमत होत नाहीत, तोपर्यंत विलीनीकरणाची प्रक्रिया पुढे नेणे तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. ​दुसरीकडे, ७४० किलोमीटर लांबीच्या कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाबाबतही सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. आतापर्यंत रोहा ते वीर आणि मडगाव ते माजोर्डा या ५५ किलोमीटरच्या टप्प्याचे दुपदरीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, उर्वरित ६८५ किलोमीटरच्या मार्गाचे काम अद्याप बाकी आहे.

टाईम्स स्पेशल

या कामासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणुकीची गरज असून, रेल्वे मंत्रालयाने सर्व संबंधित राज्य सरकारांना त्यांच्या हिश्श्यानुसार भांडवली खर्चात योगदान देण्याची विनंती केली आहे. राज्यांकडून निधी उपलब्ध झाल्यास या कामाला गती मिळू शकते. दरम्यान, रेल्वेने २६३ किलोमीटरच्या महत्त्वाच्या टप्प्यांच्या दुपदरीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याची प्रक्रिया आधीच सुरू केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg