loader
Breaking News
Breaking News
Foto

महिला म्हणजे जिद्द आणि कष्टाच्या प्रतीक - नगराध्यक्ष ममता वराडकर

मालवण (प्रतिनिधी) - आज महिला या केवळ घरकाम करणाऱ्या राहिलेल्या नाहीत, तर जिद्द आणि कष्टाचे प्रतीक बनल्या आहेत. भारतीय मजदूर संघ महिला कामगारांच्या न्याय व हितासाठी कार्यरत असून आजचा कामगार महिलांचा मेळावा हा महिलांच्या एकतेचा गौरव आहे, जिथे महिलेचा सन्मान होतो तिथे प्रगतीचा मार्ग खुला होतो, असे प्रतिपादन मालवणच्या नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी येथे बोलताना केले. भारतीय मजदूर संघाच्या वतीने मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात महिला दिनानिमित्त महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा ममता वराडकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर तसेच मजदूर संघाच्या कार्यकर्त्या प्राची परब, संचिता ठाकूर, सीमा धुरी, शुभांगी सावंत, दीपा पवार, भाग्यश्री माळकर आदी उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रारंभी नगराध्यक्ष ममता वराडकर यांच्यासह नगरसेविका चव्हाण, आचरेकर, कांदळकर तसेच नगरसेवक ललित चव्हाण यांचा भारतीय मजदूर संघाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच इतर मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तर ज्येष्ठ कष्टकरी महिला पार्वती खरात यांचा नगराध्यक्ष वराडकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी मजदूर संघांचे प्रदेश सचिव हरी चव्हाण यांनी मजदूर संघाच्या कार्याची माहिती दिली तसेच शासन निर्णयानुसार राज्यभरात घरेलू कामगारांना भांडी संचाचे वाटप करण्यात आले असताना केवळ सिंधुदुर्ग जिल्हा यापासून वंचित राहिला आहे, जिल्ह्यातील नोंदीत ९१६ घरेलू कामगारांनाही भांडी संच मिळावेत, अशी आमची आम. निलेश राणे यांच्याकडे मागणी असून नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी ही मागणी आमदारांकडे पोहचवून पाठपुरावा करावा, असे हरी चव्हाण यांनी सांगत याबाबतचे निवेदन नगराध्यक्ष ममता वराडकर यांना सादर करण्यात आले. यावर नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी घरेलू कामगार महिलांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

यावेळी पूनम चव्हाण यांनी महिलांनी कोणत्याही परिस्थितीचा बाऊ न करता, घाबरून न जाता संकटांना धैर्याने सामोरे जावे. स्त्री ही समाजाचा कणा असून महिला एकत्रित आल्यास शासनाच्या विविध योजना मिळवून घेणे शक्य होते. शासनाच्या सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी आपण कायम महिलांच्या पाठीशी राहू, असे सांगितले. अन्वेषा आचरेकर यांनी नगरपालिकेच्या महिला बालकल्याण विभागाकडून महिलांसाठी विविध शिबिरे व प्रामुख्याने आरोग्याच्या दृष्टीनेही विशेष शिबिरे घेण्यात येतील तसेच महिलांच्या मागण्या पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्यासमोर मांडण्यात येतील, असे सांगितले. या मेळाव्यात महिला स्वयंरोजगार कामगार, घरेलू कामगार, महिला बांधकाम मजूर, भाजी व मच्छी विक्री करणाऱ्या महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी भारतीय मजदूर संघाचे विभाग संघटक भगवान साटम, जिल्हाध्यक्ष सत्यविजय जाधव, उपाध्यक्ष अशोक घाडीगावकर, राजेंद्र आरेकर, कोषाध्यक्ष ओंकार गुरव, नगरसेवक ललित चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिका सावंत यांनी केले तर आभार शुभांगी सावंत यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg