रत्नागिरी : रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत किंवा महायुतीमधील इतर कोणत्याही नेत्याशी माझे कोणतेही मतभेद नसून, आम्ही सर्वजण एकमेकांच्या सातत्याने संपर्कात आहोत. महायुतीमधील सर्वच नेते अत्यंत परिपक्व आणि ज्येष्ठ असल्याने आमच्यात कोणत्याही वादाला जागा नाही, असे स्पष्ट करत भाजप नेते आमदार प्रमोद जठार यांनी स्थानिक राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आगामी निवडणुका आणि महायुतीमधील जागावाटपाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पक्षाची अधिकृत भूमिका मांडली आणि सध्या आपले पूर्ण लक्ष केवळ पक्ष संघटना मजबूत करण्यावरच असल्याचे स्पष्ट केले. प्रमोद जठार पुढे म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार नाही. त्यामुळे या भागात पक्षसंघटन मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांना ताकद देणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
पालघर ते सिंधुदुर्ग या संपूर्ण किनारपट्टीच्या भागाची जबाबदारी पक्षाने सोपवली असली, तरी रत्नागिरी जिल्हा हाच मुख्य केंद्रबिंदू ठेवून सध्या काम केले जात आहे. सिंधुदुर्ग आणि रायगड भागात भाजपचे लोकप्रतिनिधी आहेत, मात्र रत्नागिरीतील ही पोकळी भरून काढण्यासाठी राजापूर, लांजा, रत्नागिरीपासून ते अगदी मंडणगड, दापोलीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात सातत्याने दौरे करून लोकांशी संपर्क साधला जात आहे. सध्याच्या परिस्थितीत उत्तर आणि दक्षिण रत्नागिरीत भाजपचा आमदार नसला, तरी तिथल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन महायुतीमध्ये योग्य समन्वय साधण्यावर भाजपचा भर आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे हेच मुख्य उद्दिष्ट आहे. कोणत्याही निवडणुकीसाठी ५ वर्षांची पूर्वतयारी ही आवश्यकच असते. त्यामुळे निवडणुका स्वबळावर लढायच्या की युती करून, याचा अंतिम निर्णय केंद्रीय आणि राज्यातील वरिष्ठ नेतेच घेतील.
ऐनवेळी होणार्या युतीमध्ये कोणाला तिकीट दिले जाईल, हा पूर्णपणे वरिष्ठ पातळीवरील निर्णय असल्याने त्यामध्ये स्थानिक स्तरावर ढवळाढवळ करण्याचे कारण नाही. आगामी निवडणुकांच्या उमेदवारीबाबत विचारले असता, हा २०२९ चा विषय असून दिल्ली अभी बहुत दूर है असे सांगत जठार यांनी सध्या निवडणुकांपेक्षा केवळ पक्ष संघटना वाढवण्यावर भर दिला. आपण येथे कोणाचेही स्पर्धक नसून कार्यकर्त्यांना बळ देणे आणि लोकांची कामे करणे हेच आपले मुख्य उद्दिष्ट आहे. राजकारणात आपला कोणीही शत्रू नसून सर्वच पक्षांतील नेते आपले चांगले मित्र आहेत, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना आत्तापासूनच संघटन बांधणीच्या ’बॅक ऑफिस’ कामाला लागण्याचे आवाहन केले.


























































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.