loader
Breaking News
Breaking News
Foto

​शक्तीपीठ महामार्गाचा नवा आराखडा निश्चित; सिंधुदुर्गातील १४ गावांतून धावणार 'राज्य महामार्ग १०'

​सावंतवाडी : राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या पवनार (वर्धा) ते पत्रादेवी (गोवा) या 'शक्तीपीठ महामार्गा'च्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. या महामार्गाचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला असून, आता हा मार्ग 'शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग' या नावाने ओळखला जाणार आहे. विशेष म्हणजे, या मार्गाला आता 'राज्य महामार्ग क्रमांक १०' चा दर्जा देण्यात आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील १४ गावांमधून हा मार्ग जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ​सुरुवातीच्या अधिसूचनेनंतर आता प्रशासकीय पातळीवर मार्गामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील इसापूर येथून हा महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करेल. ​दोडामार्ग तालुका: कुंभवडे, फुकेरी, झोळंबे या ३ गावांतून हा मार्ग जाईल. ​सावंतवाडी तालुका: केगद, उडेली, नेने, फणसवडे, घाराप, दाभिळ, असनिये, पडवे माजगाव, पडवे, डेगवे आणि बांदा अशा ११ गावांचा यात समावेश आहे. या नवीन आराखड्यानुसार जमिनींचे सर्वेक्षण निश्चित करण्यात आले असून लवकरच पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नव्या आराखड्याचे वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या आणि डोंगराळ भागातील काही गावे यातून वगळण्यात आली आहेत. यामध्ये गेळे, आंबोली, वेर्ले, तळकट आणि कोलझर या गावांचा समावेश आहे. आता हा मार्ग चंदगड-इसापूर मार्गे थेट कुंभवडे (दोडामार्ग) येथे जोडला जाणार आहे. ​हा महामार्ग बांदा येथे मुंबई-गोवा महामार्गाला जोडला जाणार आहे. मात्र, या जोडणीवरून लोकप्रतिनिधींमध्ये दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. ​"शक्तीपीठ महामार्गाचा कोकणाला जास्तीत जास्त फायदा व्हायला हवा. केवळ बांदा येथे हा मार्ग संपवण्यापेक्षा तो रेडी बंदर आणि सागरी महामार्गाला (कोस्टल हायवे) जोडल्यास जिल्ह्याच्या व्यापाराला आणि पर्यटनाला मोठी गती मिळेल." असे माजी मंत्री आमदार दीपक केसरकर वारंवार सांगत आहेत.

टाइम्स स्पेशल

आमदार केसरकर यांनी याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. मात्र, सध्याच्या तांत्रिक आराखड्यात पालकमंत्री नितेश राणे आणि दीपक केसरकर यांच्या या प्रस्तावाला प्रशासकीय स्तरावर अद्याप प्राधान्य देण्यात आले नसल्याचे स्पष्ट होत आहे. ​नागपूर ते गोवा या दोन राज्यांना जोडणारा हा महामार्ग राज्यातील तीर्थक्षेत्रांना जोडण्याचे काम करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या बांदा - पत्रादेवी भागाला या महामार्गामुळे मोठे महत्त्व प्राप्त होणार असून, दळणवळणाची साधने अधिक वेगवान होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg