loader
Breaking News
Breaking News
Foto

‘गोवा शिपयार्ड लिमिटेड’ चा भव्य प्रकल्प लावगण येथे उभारला जाणार..

रत्नागिरी : कोकणच्या औद्योगिक प्रगतीला गती देणारी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या ‘गोवा शिपयार्ड लिमिटेड’ (GSL) या नामांकित कंपनीचा सुमारे २५०० कोटी रुपयांचा भव्य प्रकल्प रत्नागिरी तालुक्यातील जयगड नजीकच्या लावगण येथे उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या विकासाला नवे पंख लाभणार असून, रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लावगण परिसरात सुमारे १०० एकर जागेवर हा अत्याधुनिक प्रकल्प साकारला जाणार असून, त्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध झाली आहे. सध्या कंपनीकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सुमारे ३००० स्थानिक युवक-युवतींना थेट रोजगार मिळणार आहे, तर अप्रत्यक्षरित्या अनेकांना व्यवसाय आणि सेवा क्षेत्रात संधी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाच्या निर्णय प्रक्रियेत रत्नागिरीचे सुपुत्र आणि जीएसएलचे स्वतंत्र संचालक दिपक पटवर्धन यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्यकाळातच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळणे हा जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. त्याचबरोबर हा प्रकल्प रत्नागिरीत यावा यासाठी मंत्री नितेश राणे तसेच पालकमंत्री उदय सामंत यांनीही सातत्याने पाठपुरावा आणि प्रयत्न केले होते, यामुळे या यशामागे त्यांच्या प्रयत्नांचाही मोठा वाटा मानला जात आहे.

टाईम्स स्पेशल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनांशी सुसंगत असलेला हा प्रकल्प संरक्षण क्षेत्रातील देशाच्या स्वावलंबनाला अधिक बळ देणारा ठरणार आहे. अत्याधुनिक नौका बांधणी, रडार प्रणाली आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या प्रकल्पात होणार असून, त्यामुळे कोकणातील तंत्रज्ञान विकासालाही चालना मिळणार आहे. गोवा शिपयार्ड कंपनीने अलीकडच्या काळात आर्थिक प्रगतीतही मोठी झेप घेतली आहे. कंपनीने ‘बी’ श्रेणीतून ‘ए’ श्रेणीत प्रवेश केला असून, ‘नवरत्न’ दर्जासाठीचा प्रस्तावही मंजूर झाला आहे. कंपनीचा नफा ३०० कोटींच्या पुढे गेला असून, नेट वर्थमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. या प्रकल्पामुळे केवळ रोजगारनिर्मितीच नाही, तर स्थानिक बाजारपेठ, लघुउद्योग आणि सेवा क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार आहे. लावगणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी हा प्रकल्प आर्थिक विकासाचा नवा टप्पा ठरणार असून, कोकणच्या औद्योगिक नकाशावर एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg