loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी पावसाळ्यासाठी सज्ज; ९०% नालेसफाई पूर्ण

​रत्नागिरी : पावसाळा तोंडावर आला की, शहरातील सखल भागात पाणी साचण्याची आणि पूरस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांच्या मनात असते. मात्र, यंदा रत्नागिरीकरांना या चिंतेतून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी नगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी हाती घेतलेले शहरातील नालेसफाईचे काम तब्बल ९० टक्के पूर्ण केले असून, शहर पावसाळ्याच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे आणि पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली प्रशासनाने युद्धपातळीवर ही मोहीम राबवली आहे. स्वच्छता निरीक्षक संदेश कांबळे यांनी आपल्या संपूर्ण स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या ताकदीनिशी मैदानात उतरून शहरातील मुख्य आणि अंतर्गत नाल्यांच्या सफाईचे काम आता अंतिम टप्प्यात आणले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरवर्षी पावसाळ्यात रत्नागिरीतील काही भागात पाणी तुंबण्याच्या तक्रारी येतात. हीच बाब गांभीर्याने घेत पालिकेने यंदा अतिशय नियोजनबद्ध रितीने नालेसफाईचे काम हाती घेतले. शहरातील छत्रपती नगर ते किस्मत बेकरी नाला, मारुती मंदिर भाऊ सुर्वे घर ते खालचा फगरवठार नाला यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील भागातील नाल्यांची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली आहे. या भागात पावसाळ्यात पाण्याचा निचरा वेगाने व्हावा, यासाठी प्रशासनाने विशेष मेहनत घेतली आहे. यासोबतच, तोरण नाला, आदमपूर नाला, झाडगाव नाला, तांबट आळी नाला, आणि मारुती मंदिर परिसर नाला या प्रमुख जलवाहिन्यांची साफसफाई करण्यात आली असून त्यातील गाळ आणि प्लास्टिक पूर्णपणे हटवण्यात आले आहे. तसेच नाचणे रोड नाला, परटवणे नाला, टिळक आळी नाला, जेल रोड नाला, कुवारबाव नाला, राजवाडा नाला, गाडीतळ नाला, मजगाव रोड नाला आणि पटवर्धन हायस्कूल परिसर नाला या सर्वच लहान-मोठ्या नाल्यांमधील अडथळे दूर करण्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोठे यश आले आहे.

टाईम्स स्पेशल

स्वच्छता निरीक्षक संदेश कांबळे आणि त्यांच्या पथकाने, तसेच सफाई कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन शहरातील शेवटच्या टोकापर्यंतच्या नाल्यांची सफाई केली आहे. पावसाळ्यात कुठेही पाणी साचून जनजीवन विस्कळीत होणार नाही, याची पूर्ण खबरदारी प्रशासनाने घेतली आहे. आता केवळ १० टक्के उर्वरित काम शिल्लक असून, पुढील दोन-चार दिवसांत तेही पूर्ण होईल. पालिकेच्या या कौतुकास्पद आणि पूर्वतयारीच्या वेगवान कामगिरीमुळे रत्नागिरीकरांना आगामी पावसाळ्यात मोठा दिलासा मिळणार हे मात्र नक्की.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg