loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडीत १२ एप्रिलला पहिले 'आंबेडकर चौक' साहित्य संमेलन; अध्यक्षपदी कवी अजय कांडर

सावंतवाडी (प्रतिनिधी) - 'जाता नाही जात' या गाजलेल्या नाटकाचे लेखक, कवी आणि सिंधुदुर्गचे सुपुत्र दिवंगत प्रा. सिद्धार्थ विष्णू तांबे यांच्या स्मृती जपण्यासाठी यावर्षीपासून त्यांच्या मित्रमंडळींतर्फे 'आंबेडकर चौक' साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. या पहिल्या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी अजय कांडर यांची निवड करण्यात आली असून, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी वीरधवल परब निमंत्रित आहेत. रविवार, १२ एप्रिल रोजी सायंकाळी ४:३० वाजता सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात हे संमेलन रंगणार आहे. साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य कवी विठ्ठल कदम आणि कवी मधुकर मातोंडकर यांनी या उपक्रमाचे नियोजन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रा. तांबे यांनी कणकवली, वेंगुर्ले आणि पुणे येथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर वसईच्या वर्तक महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून काम केले. प्रख्यात नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या कार्यशाळेतून समोर आलेले त्यांचे 'जाता नाही जात' हे नाटक 'अविष्कार' संस्थेने रंगभूमीवर आणले. या नाटकाने मराठी नाट्यपरंपरेत स्वतंत्र वैचारिक ओळख निर्माण केली. त्यांचा काव्यसंग्रहही प्रसिद्ध असून, त्यातील 'आंबेडकर चौक' या कवितेने त्यांना मराठी साहित्यात कवी म्हणून मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या अकाली निधनानंतर ही पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या नावाने हे संमेलन सुरू करण्यात येत आहे. ​संमेलनाध्यक्ष अजय कांडर यांची 'युगानुयुगे तूच' ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील दीर्घ कविता सध्या विशेष चर्चेत आहे.

टाइम्स स्पेशल

या कवितेवर आधारित नाटकाचे प्रयोगही राज्यभर होत आहेत. तसेच त्यांच्या या कवितासंग्रहाचा हिंदी अनुवाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एम.ए. (हिंदी) अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. ​प्रमुख पाहुणे कवी वीरधवल परब हे महाराष्ट्र फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या पुरस्कारांनी सन्मानित असून, विद्रोही चळवळीतील एक महत्त्वाचे नाव आहेत. कांडर आणि परब या दोन्ही मान्यवरांचे प्रा. तांबे यांच्याशी जिव्हाळ्याचे स्नेहसंबंध होते. ​या आगळ्यावेगळ्या साहित्य संमेलनाला सिंधुदुर्गातील साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक विठ्ठल कदम आणि मधुकर मातोंडकर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg