loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडी पंचायत समितीची चार वर्षांनंतर मासिक सभा; रखडलेल्या विकासकामांवरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले

सावंतवाडी (प्रतिनिधी): तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर सावंतवाडी तालुका पंचायत समितीची मासिक सभा सभापती सुस्मिता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत आरोग्य, पाणी टंचाई, रखडलेली घरकुले आणि प्रशासकीय इमारतीचा प्रश्न यावरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ​सभेत ठाकरे शिवसेनेचे सदस्य उदय पारिपत्ये यांनी आरोग्य विभागाच्या कारभारावर लक्ष वेधले. जिल्हा परिषदेच्या रुग्णालयात सकाळी ८ वाजता रुग्णसेवा सुरू होणे गरजेचे आहे, जेणेकरून मधुमेह तपासणीसाठी उपाशीपोटी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होणार नाही, असे त्यांनी सूचित केले. आरोग्य विभागाने जानेवारी महिन्यात २३ जणांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती सभागृहात दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेताना ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी सुदेश राणे यांनी सांगितले की, जलजीवन मिशन अंतर्गत अनेक कामे निधीअभावी रखडली आहेत. ५२ कोटींच्या कामांपैकी ३४ कोटींचा केंद्राचा निधी येणे बाकी असल्याने कामांना मुदतवाढ द्यावी लागली आहे. इन्सुल आणि कलंबिस्त नळ पाणी योजनेच्या अपूर्ण कामांबाबत लवकरच ठेकेदार व अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेण्याचे उपसभापती गौरव मुळीक यांनी स्पष्ट केले. तसेच तिलारी पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायतींना जादा दराने पाणी देत असल्याच्या तक्रारीची चौकशी करण्याचे आश्वासन सभापतींनी दिले. ​पंचायत समितीला स्वतःचे हक्काचे सभागृह नसल्याने सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासकीय भवनाचे काम सुरू होण्यापूर्वी कार्यालयाचे स्थलांतर करणे आणि नवीन इमारत तातडीने पूर्ण करण्याचे मोठे आव्हान सभापती सुस्मिता जाधव यांच्यासमोर आहे. पावसाळा तोंडावर असल्याने कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच गती घ्यावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

टाईम्स स्पेशल

​गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी घरकुल योजनेची माहिती देताना सांगितले की, ३५३ घरकुले पूर्ण झाली असून केंद्र स्तरावरून निधी मिळण्यास विलंब झाल्याने काही हप्ते रखडले आहेत. पशुवैद्यकीय विभागात ७ पदे रिक्त असल्याची माहिती डॉ. विद्यानंद देसाई यांनी दिली. या सभेत 'सरपंच समिती' स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ​या बैठकीला उपसभापती गौरव मुळीक, गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक, सदस्य उदय पारिपत्ये, महेश धुरी, प्राजक्ता केळुसकर, प्रथमेश सावंत, उत्कर्षा गावकर, शरद घाऊसकर, धनश्री मराठे, सदाशिव राणे, प्रणाली टिळवे, व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg