loader
Breaking News
Breaking News
Foto

निसर्ग पर्यटनातून आर्थिक सुबत्ता आणि पर्यावरणाचे रक्षण

रत्नागिरी: निसर्गाची अनमोल देणगी असलेल्या कांदळवनाचे (मॅन्ग्रोव्हज) संवर्धन केवळ सरकारी फाईल्सपुरते मर्यादित न ठेवता, त्यातून शाश्वत उपजीविका कशी निर्माण करता येते, याचा आदर्श रत्नागिरी तालुक्यातील नाचणे येथील गावकऱ्यांनी घालून दिला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली नाचणे-नारायणमळी येथे सुरू झालेल्या 'नवलाई कांदळवन निसर्ग पर्यटन' प्रकल्पाने वर्षभरात सहा हजारांहून अधिक पर्यटकांना आकर्षित करत १४ लाख रुपयांची उलाढाल केली आहे. या यशाची दखल घेत २०२५ चा मानाचा 'स्पेसिज हॅबिटाट वॉरियर्स' पुरस्कारही या गटाला मिळाला असून, वनमंत्री गणेशजी नाईक यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नाचणे येथील शहराला लागून असलेल्या खाडी परिसरातील जैवविविधतेचे महत्त्व ओळखून येथे 'कांदळवन सह व्यवस्थापन समिती'ची स्थापना करण्यात आली. याअंतर्गत महिला आणि पुरुषांच्या सहभागातून 'नवलाई कांदळवन निसर्ग पर्यटन गट' आकारास आला. प्रकल्पाची सुरुवात करण्यापूर्वी केवळ साहित्य खरेदीवर भर न देता, गटातील सदस्यांनी कांदळवन ओळख, पक्षी निरीक्षण आणि निसर्ग भ्रमंतीचा सखोल अभ्यास केला. कांदळवन कक्षाने पुरवलेली विना इंजिन नौका, कयाकिंग, दुर्बीण आणि जीवरक्षक जॅकेट्स या साहित्याचा वापर करून मार्च २०२४ मध्ये हा प्रकल्प अधिकृतपणे पर्यटकांच्या सेवेत रुजू झाला.

टाईम्स स्पेशल

विशेष म्हणजे, पर्यटकांना माहिती देताना कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी या गटाने शाळा आणि महाविद्यालयांच्या अभ्यास फेऱ्यांचे आयोजन करून स्वतःला प्रशिक्षित केले. आज येथे येणारे पर्यटक केवळ निसर्गाचा आनंदच घेत नाहीत, तर कांदळवनाचे पर्यावरणीय महत्त्वही समजून घेतात. दीपक गजने, निलेश गजने, अभी गजने, अमर गजने, संतोष वाडेकर यांच्यासह रिद्धी गजने , सानवी गजने आणि सेजल गजने या महिला सदस्य खांद्याला खांदा लावून हा प्रकल्प यशस्वीपणे राबवत आहेत. ​निसर्ग पर्यटनामुळे स्थानिक विकासाला चालना मिळाली असून, 'कांदळवन हे नुसते जंगल नसून निसर्गाने दिलेली मोठी देणगी आहे' ही भावना आता जनमानसात रुजली आहे. या प्रकल्पामुळे निसर्गाचा समतोल राखत रोजगाराच्या नवीन वाटा खुल्या झाल्या असून, कोकणातील इतर किनारपट्टीवरील गावांसाठी नवलाई गटाने एक दीपस्तंभ उभा केला आहे. येणाऱ्या काळात अधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यटकांना पर्यावरणाशी जोडण्याचा या गटाचा मानस आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

रत्नागिरीच्या नाचणे येथील 'नवलाई' गटाची गरुडझेप

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg