loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जि.प.च्या खर्चाची ‘कुंडली’ निघणार, विलास चाळकेंचा कारवाईचा इशारा

रत्नागिरी: गेल्या दोन वर्षांपासून लोकप्रतिनिधींविना केवळ प्रशासकीय राजवटीत असलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या तिजोरीतून झालेल्या खर्चाचा हिशेब आता चव्हाट्यावर येणार आहे. २०२३-२४ आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षात प्रशासनाने अर्थसंकल्पात अवाढव्य तरतुदी केल्या होत्या, मात्र आता निवडणुका जवळ आल्याने आणि लोकप्रतिनिधी सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट होताच, आगामी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात प्रशासनाने हात आखडता घेतल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेवर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले असून, प्रशासकीय कालावधीत झालेल्या संशयास्पद खर्चाची सखोल चौकशी करण्याचा आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मागील दोन वर्षांच्या कालावधीचा आढावा घेतल्यास, जिल्हा परिषदेवर प्रशासकांचे वर्चस्व होते. या काळात अनेक विकासकामांसाठी आणि योजनांसाठी कोट्यवधींच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या. मात्र, या तरतुदींचा विनियोग नेमका कसा झाला आणि तो सर्वसामान्यांच्या हितासाठीच खर्च झाला का, याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे, आगामी आर्थिक वर्षात जेव्हा लोकप्रतिनिधींची सत्ता पुन्हा प्रस्थापित होईल, अशा वेळी प्रशासनाने तरतुदींमध्ये कपात केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. प्रशासनाने स्वतःच्या हातात सत्ता असताना तिजोरी मोकळी केली आणि आता लोकप्रतिनिधी येणार म्हटल्यावर बजेटवर मर्यादा आणल्या, असा आरोप केला जात आहे.

टाइम्स स्पेशल

विलास चाळके यांनी स्पष्ट केले की, प्रशासकीय कालावधीत अवाढव्य तरतुदी करून जो खर्च झाला आहे, त्याचे 'ऑडिट' होणे आवश्यक आहे. जर या काळात निधीचा गैरवापर झाला असेल किंवा नियमबाह्य पद्धतीने कामे उरकली गेली असतील, तर कुणाचीही गय केली जाणार नाही. चुकीचा खर्च करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि संबंधित घटकांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. यापूर्वीही जिल्हा परिषदेच्या अनेक कामांवरून विरोधकांनी आणि समाजसेवकांनी प्रशासकीय पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता खुद्द लोकप्रतिनिधींनीच या प्रकरणाची तड लावण्याचे संकेत दिल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आगामी काळात ही चौकशी नक्की काय वळण घेते आणि त्यातून कोणते 'घबाड' बाहेर येते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. लोकशाहीत जनतेचा पैसा हा लोकहितासाठीच खर्च झाला पाहिजे, हा पवित्रा घेत चाळके यांनी प्रशासनाला एकप्रकारे 'अल्टिमेटम'च दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg