loader
Breaking News
Breaking News
Foto

दादर–रत्नागिरी पॅसेंजर गाडी तात्काळ सुरू करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा : शिवसेना उबाठा

खेड (प्रतिनिधी) : दादर–रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी, तसेच कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या विलीनीकरणाच्या हालचाली त्वरित रद्द कराव्यात, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून देण्यात आला आहे. यासंदर्भात खेड रेल्वे स्टेशन येथे जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन मास्तर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे दादर–रत्नागिरी पॅसेंजर गाडी पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. सध्या ही सेवा बंद असल्यामुळे कोकणातील हजारो प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, विशेषतः रोजंदारी कामगार, व्यापारी, विद्यार्थी आणि मुंबईत उपचारासाठी जाणारे रुग्ण यांना महागड्या खाजगी वाहतुकीचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांवर मोठा आर्थिक ताण येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकण रेल्वे ही केवळ वाहतूक सेवा नसून कोकणवासीयांच्या विकासाची जीवनवाहिनी असल्याचा उल्लेख करत, तिच्या अस्तित्वावर कोणताही आघात सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली. स्वर्गीय मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या प्रयत्नातून १९९४ साली साकारलेल्या या प्रकल्पासाठी स्थानिकांनी अल्प मोबदल्यात जमिनी दिल्या होत्या, याचीही आठवण करून देण्यात आली. दादर स्थानकावरून पूर्वी सुरू असलेली खेड–दादर आणि नंतर रत्नागिरी–दादर सेवा प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत होती. मात्र सध्या दादर स्थानकावरील थांबा हटवल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी माजी खासदार विनायक राऊत यांनीही यापूर्वी रेल्वे प्रशासनाशी पाठपुरावा करून दादरवरूनच सेवा सुरू करण्याचे आश्वासन मिळाल्याचा उल्लेख करण्यात आला. तसेच कोकण रेल्वेचे मध्य रेल्वेत विलीनीकरण करण्याच्या हालचालींमुळे कोकणात तीव्र नाराजी पसरली असून, हा निर्णय कोकणच्या विकासाला धक्का देणारा ठरेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या पार्श्वभूमीवर इशारा देताना स्पष्ट केले आहे की, मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास पनवेल रेल्वे स्थानकावरून कोकण मार्गावरील रेल्वे वाहतूक रोखण्यासह तीव्र आंदोलन छेडले जाईल. दरम्यान, खेड रेल्वे स्थानकावर निवेदन देताना जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर यांच्यासह ऋषिकेश कानडे, उपशहर प्रमुख बेटा निर्मळ, विभाग प्रमुख सचिन खेडेकर, सुनील सदरे, ज्येष्ठ शिवसैनिक संजय चव्हाण आणि संगम चिखले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg