loader
Breaking News
Breaking News
Foto

पावस पुलाच्या कामाला वेग; एका पिलरचे काम पूर्ण, वर्षभरात पूल वाहतुकीस खुला होण्याची शक्यता

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या रत्नागिरी-राजापूर मार्गावरील पावस येथील गौतमी नदीवरील पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, या कामात मोठी प्रगती पाहायला मिळत आहे. मागील अनेक दिवसांपासून रखडलेल्या या पुलाचा प्रश्न आता मार्गी लागत असून, एकूण तीन पिलरपैकी एका पिलरचे (खांबाचे) बांधकाम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक असणारे गर्डरदेखील तयार करण्यात आले असून ते नदीपात्रात ठेवण्यात आले आहेत. कामाचा सध्याचा वेग पाहता, येत्या वर्षभरात या पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला होण्याची दाट शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​शासकीय नोंदीनुसार, हा प्रकल्प रत्नागिरी तालुक्यातील रेवस-रेड्डी या राज्यमार्ग क्रमांक ३ वर येत असून ५८/६३० किलोमीटर अंतरावर असलेल्या या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता आधीच प्राप्त झाली होती. या पुलाच्या कामासाठी ६ कोटी ४१ लाख ६६ हजार ६९० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, याच रकमेच्या निविदेला मंजुरी देण्यात आली आहे. 'मे. मॉडर्न आर्च इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.' या कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला असून, १८ महिन्यांच्या मुदतीत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ​पुलाच्या तांत्रिक रचनेचा विचार केला तर हा पूल 'नॉन सबमर्सिबल' स्वरूपाचा असून त्याला ३० मीटरचे दोन स्पॅन असणार आहेत. सध्याच्या स्थितीचा आढावा घेतल्यास, ए-२ (A-2) पिअर कॅपपर्यंतचे काँक्रीट पूर्ण झाले आहे, तर पी-१ (P-1) या पिअरचे काँक्रीटही पूर्ण झाले आहे. सध्या ए-१ (A-1) च्या पाइल काँक्रीटचे काम प्रगतीपथावर आहे.

टाईम्स स्पेशल

विशेष म्हणजे, दोन गर्डरचे काँक्रीट आधीच पूर्ण झाल्याने कामाची गती समाधानकारक असल्याचे दिसते. ​पुलाच्या मुख्य बांधकामासोबतच या प्रकल्पात पोचमार्गासाठी लागणारा मातीभराव, खडीकरण, मजबुतीकरण आणि डांबरीकरण या गोष्टींचाही समावेश आहे. याशिवाय मुरुम बाजूपट्टी आणि कच्च्या गटारांचे कामही केले जाणार आहे. पावसचा हा पूल या भागातील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. या पुलाचे काम पूर्ण झाल्यावर रत्नागिरी आणि राजापूर दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार असून, पर्यटनाच्या दृष्टीनेही याला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg