loader
Breaking News
Breaking News
Foto

राजवाडी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अडीच टन तांदूळ वाटप

रत्नागिरी - संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी-ब्राह्मणवाडी येथे आयोजित ‘शेतकरी सहाय्यता’ कार्यक्रमात राजवाडीसह तीन गावांमधील शेतकऱ्यांना सुमारे अडीच टन तांदुळाचे वाटप करण्यात आले. संगमेश्वर तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राजवाडी, चिखली आणि धामणी या गावांमध्ये कार्यरत असलेल्या ‘पीपल्स एम्पॉवरिंग मुव्हमेंट’ या संस्थेच्या पुढाकाराने काही वर्षांपूर्वी स्थानिक शेतकऱ्यांचे गट स्थापन करण्यात आले असून या गटांना बारमाही सिंचनाचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, मागील खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदत करण्यासाठी पुणे येथील ‘बॉंसुरी फाउंडेशन-ॲलिकॉन कॅस्टलॉय’ आणि ‘पीपल्स एम्पॉवरिंग मुव्हमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने या शेतकरी गटांच्या ४४ सदस्यांना प्रत्येकी ६० किलो तांदूळ वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बोलताना तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी शेतकरी गटांची अधिकृत नोंदणी करण्याचे महत्त्व अधोरेखित करुन जलकुंड, मत्स्यव्यवसाय, काळीमिरी लागवड, शेतकरी पुरस्कार योजना आणि सामूहिक शेती इत्यादी योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी योग्य नियोजन केले जाईल, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राजवाडीतील प्रयोगशील शेतकरी, माजी सरपंच संतोष भडवळकर यांनी जंगली प्राण्यांमुळे होणारे नुकसान, त्यावरील उपाययोजना, शेतीतील अडचणी, खते व बियाण्यांचा वेळेवर पुरवठा, विविध कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, आवश्यक कागदपत्रे, याबाबतच्या समस्या मांडल्या. कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी या सर्व मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. तसेच आरवली मंडल कृषी अधिकारी मनीषा खेडेकर, सहाय्यक कृषी अधिकारी तेजल मालवणकर आणि उपकृषी अधिकारी मिलिंद आंबेकर यांनीही सकारात्मक भूमिका घेऊन विविध योजना राबवण्यासाठी उत्सुक शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.

टाईम्स स्पेशल

राजवाडी येथील'पीपल्स एम्पॉवरिंग मूव्हमेंट' संस्थेचे अध्यक्ष सतीश कामत यांनी या वेळी मनोगत व्यक्त करताना, गावातील पडिक जमिनीवर कमी कष्टाच्या आणि खर्चाच्या, कीड-रोगाचा फारसा प्रादुर्भाव न होणाऱ्या बांबू आणि सागाची लागवड करण्याचे आवाहन केले. नियमितपणे उत्पन्न देणारी ही लागवड शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचे ‘एटीएम’ ठरू शकते, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. ब्राह्मणवाडीचे वाडीप्रमुख प्रकाश खांबे यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. राजवाडीचे माजी उपसरपंच सुहास लिंगायत, विलास गोमाने, धामणीच्या शेतकरी गटाचे प्रवर्तक प्रकाश रांजणे, चिखलीच्या शेतकरी गटाचे प्रवर्तक बारकु धनावडे इत्यादी शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते. त्याचबरोबर शेतकरी महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg