loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीच्या समुद्रात 'एलपीजी' जहाजाचा लढा; भारत की पाकिस्तान? दोन मालकांच्या वादात जहाज अधांतरी

रत्नागिरी : रत्नागिरीतील जयगड बंदराच्या नजीक अरबी समुद्रात सध्या एका गॅसवाहू जहाजावरून हायव्होल्टेज ड्रामा सुरू आहे. ओमनवरून जयगड बंदरासाठी निघालेले १८०० मेट्रिक टन एलपीजी गॅसने भरलेले हे जहाज सध्या किनाऱ्यापासून दूर समुद्रात उभे आहे. या जहाजाच्या प्रवेशावरून मोठी खळबळ उडाली असली, तरी त्यामागील कारण अत्यंत धक्कादायक आणि रंजक आहे. या जहाजाचे दोन मालक असून, त्यापैकी एकाला हा गॅस भारतात पाठवायचा आहे, तर दुसऱ्या मालकाचा ओढा तो पाकिस्तानला नेण्याकडे आहे. मालकांच्या या 'भारत विरूद्ध पाकिस्तान' युद्धामुळे हे जहाज सध्या ना घरचे ना घाटचे अशा अवस्थेत अडकले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

साधारणपणे तांत्रिक बिघाड किंवा हवामानामुळे जहाजे थांबवली जातात, पण या प्रकरणाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ओमनहून निघालेले हे जहाज जयगड बंदरात दाखल होणार होते, परंतु ऐनवेळी दोन मालकांमधील अंतर्गत वाद उफाळून आला. एका मालकाच्या मते हा व्यवहार भारतीय बाजारपेठेसाठी झाला आहे, तर दुसरा मालक हा गॅस पाकिस्तानच्या दिशेने वळवण्याच्या प्रयत्नात आहे. या वादाचा थेट परिणाम जहाजाच्या कायदेशीर कागदपत्रांवर झाला आहे. बंदरात प्रवेश करण्यासाठी आणि मालाची उतरवणूक करण्यासाठी आवश्यक असणारी महत्त्वाची कागदपत्रे या मालकी हक्काच्या वादामुळे पूर्ण होऊ शकलेली नाहीत.

टाइम्स स्पेशल

​बंदर प्रशासनाने या प्रकरणी अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळे नियमानुसार या जहाजाला जयगड बंदरात प्रवेश नाकारण्यात आला आहे. दरम्यान, या जहाजाचा किंवा त्यावरील कर्मचाऱ्यांचा पाकिस्तानशी कोणताही संशयास्पद संबंध असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, बंदर विभागाने या अफवांना पूर्णविराम दिला आहे. जहाजाचा पाकिस्तानशी कोणताही थेट संबंध नसून, केवळ दोन मालकांच्या व्यावसायिक वादामुळे आणि पर्यायाने अपुऱ्या कागदपत्रामुळेच ते समुद्रात उभे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ​१८०० मेट्रिक टन एलपीजी गॅसचा साठा असलेले हे जहाज सध्या जयगडच्या समुद्रात लाटांवर हेलकावे खात असून, जोपर्यंत दोन्ही मालकांमधील हा वाद सुटत नाही किंवा कागदपत्रांची कायदेशीर पूर्तता होत नाही, तोपर्यंत या जहाजाला बंदरात थारा मिळणार नसल्याचे चित्र दिसत आहे. या विचित्र वादामुळे सागरी सीमांवर मात्र सध्या या जहाजाचीच चर्चा रंगली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg