loader
Breaking News
Breaking News
Foto

ना.नितेश राणेंना कोर्टाचा मोठा दणका! १ महिना कारावासासह १ लाख रूपये दंडाची शिक्षा

सिंधुदुर्ग - राज्याचे मत्स्य विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री, भाजपचे युवा आणि डॅशिंग नेते नामदार नितेश नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवत १ महिन्यांचा कारावास व १ लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मुंबई -गोवा महामार्गावर पडलेल्या खड्डयांच्या विरोधात ना. नितेश राणे यांनी आंदोलन केले होते. त्या दरम्यान हा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला होता. विशेष म्हणजे या आंदोलनात महामार्ग विभागाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलफेक केल्याचा आरोपदेखील त्यांच्यावर होता. मात्र या आरोपातून नितेश राणे यांची जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याबद्दल शिक्षा ठोठावण्यात आली असली तरी शिक्षेच्या तत्काळ अंमलबजावणीला स्थगिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे याबाबत रिव्हिजन अर्ज दाखल करण्यात आला असल्याचे सांगताना उच्च न्यायालयातदेखील या शिक्षेविरोधात दाद मागण्यात येणार असल्याचे ना. नितेश राणे यांचे वकील अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नितेश राणे हे सध्या भाजपमध्ये आहेत. मात्र ते जेव्हा काँगे्रसमध्ये होते. त्यावेळी ४ जुलै २०१९ मध्ये त्यांनी मुंबई - गोवा महामार्गावर पडलेले खड्डे आणि चिखल यामुळे जनतेचे हाल होत असल्याने लोकहितार्थ कणकवली येथे गडनदी पुलावर हे आंदोलन केले होते. हे आंदोलन चांगलेच गाजले होते. संतप्त आमदार नितेश राणे आणि त्यांच्या अन्य सहकार्‍यांनी आंदोलनस्थळी बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर हे आले असता त्यांच्या डोक्यावर महामार्गावर साचलेला चिखल एका बादलीत भरून त्याची त्यांना आंघोळ घातल्याचा आरोपदेखील त्यांच्यावर होता. गडनदी पुलावर हे आंदोलन झाले होते. चिखलाने भरलेल्या बादल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या अंगावर ओतत अतिशय आक्रमक पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनप्रकरणी तत्कालिन आमदार नितेश राणे यांच्यासह एकूण ४० जणांवर भा.द.वि.क. ३५३, ३३२, ५०४, ५०६, आदी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी रितसर कारवाई करून नितेश राणे आणि त्यांच्या एकूण ४० सहकार्‍यांवर गुन्हा दाखल केला आणि अधिक तपास करत जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

टाईम्स स्पेशल

२७ एप्रिल २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने या खटल्याचा निकाल दिला आहे. यामध्ये चिखलफेक केल्याप्रकरणी जे गुन्हे दाखल होते त्यातून नितेश राणे आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. भा.द.वि.क. ३५३, ३३२, ५०६ या कलमांतर्गत दाखल केलेले आरोप फेटाळत त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र भा.द.वि.क. ५०४ या कलमाखाली मात्र त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी नितेश राणे यांना कोर्टाने दोषी ठरवत १ महिना कारावास आणि १ लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान ना. नितेश राणे यांचे वकील अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी या शिक्षेला तत्काळ स्थगिती द्यावी असा अर्ज दाखल केला असून लवकरच रिव्हिजन याचिका दाखल करणार असल्याची माहिती अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी पत्रकारांना दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg