loader
Breaking News
Breaking News
Foto

पर्यावरण जनजागृती सायकल यात्रेचे मालवणात स्वागत

मालवण (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग राष्ट्रसेवा दल यांच्या वतीने जिल्ह्यात काढण्यात आलेल्या पर्यावरण जनजागृती सायकल यात्रेचे मालवणात आगमन झाले. आचरा, रेवंडी, कोळंब व मालवण शहर येथे या सायकल रॅलीचे स्वागत होऊन स्थानिकांनी रॅलीत सहभाग दर्शविला. कोकणचे हिरवगार सौंदर्य आबाधित राखायचे असेल तर आपल्या पर्यावरणाचे रक्षण आपणच केले पाहिजे. जर आपण वृक्ष तोड, नदी- नाल्याचे प्रदूषण करतच राहिलो तर मानव जातीचे भवितव्य धोक्यात येईल. त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण हे आपण केलेच पाहिजे, असे आवाहन यावेळी राष्ट्रसेवा दलाचे नितीन वाळके यांनी केले. सिंधुदुर्ग राष्ट्रसेवा दल यांच्या वतीने पर्यावरण जनजागृती सायकल यात्रा २०२६- 'सागर ते सह्याद्री, बीज अंकूरे अंकूरे' या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी २३ मे रोजी विजयदुर्ग येथे या रॅलीचा शुभारंभ झाला. मोठ्या उत्साहात या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. ही रॅली मालवण तालुक्यात दाखल झाल्यावर आचरा बाजारपेठ येथे स्थानिक व्यापारी व ग्रामस्थांनी या सायकल रॅलीला भेट देऊन स्वागत करत पर्यावरण जनजागृतीबाबत कौतुक केले. तर आज ही रॅली मालवण शहराच्या दिशेने निघाल्यावर रेवंडी- कोळंब पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने कोळंब हडकर स्टॉप येथे यात्रेचे स्वागत करण्यात आले. स्वागत कार्यक्रमानंतर मालवण शहरात सायकल रॅली फिरविण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी कोळंबचे उपसरपंच विजय नेमळेकर, रेवंडी सरपंच अमोल वस्त, राष्ट्रसेवा दलाचे नितीन वाळके, बाळू मेस्त्री, हरिहर वाटवे, सुहास ठाकुर देसाई, नितीन तळेकर, सहदेव पाटकर, दूर्वांक मेस्त्री, रवी खोत, युगांत चव्हाण, सुदीप दिगवळेकर, तन्मय पंडित, मेधांश बांदेकर, स्वाती पारकर, मेगल डिसोजा, राहुल जाधव, भिवा शिरोडकर, किरण साळगावकर, ओम साळुंखे, साई साळुंखे, आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना नितीन वाळके म्हणाले, विजयदुर्ग येथून निघालेल्या सायकल रॅलीच्या प्रवासादरम्यान ठिकठिकाणी विकासाचे क्रूर रूप पहावयास मिळाले. विजयदुर्ग ते तरेळे पर्यंत मार्गाचे चौपदरीकरण काम सुरू आहे. यात अनेक झाडे, वटवृक्ष कापले गेले आहेत. एक वटवृक्ष जळत असताना पाहिला. विकासाचे हे क्रूर रूप सर्वांच्या मनाला चटका लावून गेले. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. विकास हा झाला पाहिजे, मात्र विकास करताना पर्यावरणाचा विध्वंस केला जाऊ नये. आज प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे. मोठे- मोठे वटवृक्ष ही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतरित करून नेऊन लावू शकतात. ते तोडून किंवा जाळून नष्ट केले पाहिजे असे नाही. हे सर्व असताना अशा पद्धतीचा विध्वंस मांडला जात आहे. खऱ्या अर्थाने आधुनिक विकासाचे भकास रूप या कडक उन्हाळ्याच्या रूपाने, विजेच्या खेळखंडोबाच्या रूपाने आणि अवकाळी पावसाच्या रूपाने साऱ्यानी पाहिले. जर माणसाने सृष्टीचा विनाश थांबविला नाही तर पुढच्या ५ ते १० वर्षांमध्ये किनारपट्टीची गावे ही पाण्याखाली जाणार हे निश्चित आहे. निसर्गाचा ऱ्हास करत राहिलो, झाडे तोडत राहिलो, नदी नाले प्रदूषित करत राहिलो तर मानव जातीचे भवितव्य धोक्यात येईल, त्यासाठी आपण पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे, असेही नितिन वाळके म्हणाले. मालवण शहरात दाखल झालेली ही सायकल रॅली सायंकाळी कुडाळ येथे जाण्यास रवाना झाली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg