loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचा ७० वा पदग्रहण सोहळा, नुतनअध्यक्ष अ‍ॅड. मनिष नलावडे, सचिव आनंद चौगुले, खजिनदार धिरज वेल्हाळ यांची निवड

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचा ७० वा पदग्रहण सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या वेळी ॲड. मनीष नलावडे यांना रोटरीची मानाची कॉलर प्रदान करून अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली. पुण्यातील रोटरी जिल्हा ३१३१च्या माजी जिल्हा गव्हर्नर मंजू फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. आनंद चौगुले यांची सचिवपदी, तर धीरज वेल्हाळ यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुण्या तथा पदग्रहण अधिकारी माजी जिल्हा गव्हर्नर मंजू फडके यांनी रोटरीची विचारसरणी, नेतृत्वगुण आणि समाजसेवेचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. “तुम्हीच तुमचे आणि तुमच्या संस्थेचे खरे ब्रँड प्रतिनिधी असता,” असे सांगत त्यांनी प्रत्येक सदस्याने आपल्या कृतीतून संस्थेची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचे आवाहन केले. रोटरीमध्ये अशाच व्यक्ती एकत्र येतात, ज्यांना समाजासाठी काहीतरी विधायक करण्याची आवड आणि तळमळ असते. एकट्याने काम करण्यापेक्षा संघभावनेने एकत्र येऊन कार्य केल्यास समाजात मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणता येतो; या भावनेतून रोटरी सदस्य कार्यरत असतात, असे त्यांनी नमूद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रोटरी सदस्यत्वाचे महत्त्व अधोरेखित करताना त्या म्हणाल्या, “आयुष्यात मौजमजा सर्वजण करतात; मात्र रोटरी सदस्य मौजमजेबरोबर सामाजिक भान जपत समाजासाठीही कार्य करतो.” नेतृत्वविकासाबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, समस्या प्रत्येकालाच असतात; मात्र त्यांचा बाऊ न करता त्यावर उपाय शोधत पुढे जाणे हेच खऱ्या नेतृत्वाचे लक्षण आहे. कॉफी तयार करणाऱ्या यंत्राचे उदाहरण देत त्यांनी नेतृत्वकौशल्याचे महत्त्व स्पष्ट केले. “माणूस तोच असतो; मात्र तुम्ही त्याच्याकडून काम कसे करून घेता, यावर तुमचे कौशल्य आणि त्या व्यक्तीचे कार्यपरिणाम अवलंबून असतात,” असे सांगत त्यांनी प्रभावी संवाद, प्रेरणा आणि संघभावना यांचे महत्त्व विशद केले.नूतन अध्यक्ष ॲड. मनीष नलावडे यांनी आपल्या मनोगतात रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या ७० वर्षांच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख करत या परंपरेला नवी दिशा देण्याचा संकल्प व्यक्त केला. अध्यक्षपद स्वीकारताना ते म्हणाले, “रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना मी स्वतःला भाग्यवान समजतो. गेली ७० वर्षे या क्लबने समाजसेवेची उज्ज्वल परंपरा निर्माण केली आहे आणि त्या परंपरेला पुढे नेण्याची संधी मला मिळत आहे, याचा मला विशेष अभिमान वाटतो.”

टाइम्स स्पेशल

रोटरी इंटरनॅशनलच्या “Create Lasting Impact” आणि डिस्ट्रिक्टच्या “Team Phoenix” या संकल्पनांना अनुसरून रोटरी वर्ष २०२६-२७ हे “कर्तव्याचा जागर महोत्सव” म्हणून साजरे करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी ते म्हणाले, “हे केवळ एक रोटरी वर्ष नसेल, तर सेवा, संस्कार, विकास आणि उत्साहाचा अखंड उत्सव असेल. प्रत्येक सदस्य, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक नागरिकाला या उत्सवाचा भाग बनवण्याचा आमचा प्रयत्न असेल.”यावेळी रत्नागिरीतील १८ वर्षांवरील युवक-युवतींना रोटरॅक्ट क्लबमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. इच्छुक विद्यार्थ्यांच्या व युवकांच्या मुलाखती घेऊन त्यांना रोटरॅक्ट क्लबमध्ये प्रवेश देण्यात येणार असून, नेतृत्वगुण, व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक बांधिलकी आणि कौशल्यवृद्धीच्या माध्यमातून त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी रोटरीतर्फे विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे अध्यक्ष ॲड. मनीष नलावडे यांनी सांगितले. शेवटी अध्यक्ष ॲड. मनीष नलावडे यांनी सर्व सदस्यांना “कर्तव्याचा जागर” या संकल्पनेत सहभागी होण्याचे आवाहन करत, “Service Above Self” या रोटरीच्या ब्रीदवाक्याला कृतीत उतरवून रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे ७० वे वर्ष सर्वात संस्मरणीय, प्रभावी आणि प्रेरणादायी बनवूया,” असे आवाहन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

रोटरी वर्ष २०२६-२७ ‘कर्तव्याचा जागर महोत्सव’ म्हणून साजरे होणार

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg