loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली येथील कुणबी सेवा संघाच्या छात्रालयांमध्ये नवागतांच्या स्वागताबरोबरच पालक-विद्यार्थी संस्थाचालक मेळावा उत्साहात

दापोली (प्रतिनिधी) - दापोली येथील कुणबी सेवा संघाच्या नवभारत छात्रालय आणि पूज्य सामंत गुरुजी कन्या छात्रालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत तसेच विद्यार्थी, पालक आणि संस्था पदाधिकाऱ्यांचा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्याच्या माध्यमातून पालकांना छात्रालयातील सुविधा, नियमावली आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे, उपाध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत, सदस्य डॉ. राजेंद्र खांडेकर, प्रभाकर तेरेकर, शिवप्रसाद चौगुले, रवींद्र गोरिवले, सरचिटणीस हरिश्चंद्र कोकमकर, सहचिटणीस राजेंद्र शिंदे, छात्रालय अधीक्षक सुनिल ठाकूर, अधीक्षिका वर्षा गोरिवले तसेच विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाच्या प्रारंभी छात्रालय अधीक्षक सुनिल ठाकूर यांनी छात्रालयातील शिस्त, नियम व अटी, विद्यार्थ्यांच्या दैनंदिन दिनचर्येबाबतची माहिती आणि विद्यार्थ्यांनी पाळावयाच्या आवश्यक बाबी यांचे सविस्तर विवेचन केले. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना छात्रालय हे केवळ निवासस्थान नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे केंद्र असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी छात्रालयातील नियमांचे प्रामाणिकपणे पालन करून शिस्त, वेळेचे नियोजन आणि चांगल्या सवयी अंगीकाराव्यात अशाप्रकारचे आवाहन करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, व्यक्तिमत्त्व विकास आणि विविध स्पर्धात्मक उपक्रम नियमितपणे राबवत असून विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे त्यांनी सांगितले. पालकांनीदेखील आपल्या पाल्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवून त्यांना सकारात्मक प्रेरणा देण्याचे आवाहन त्यांनी केले.

टाईम्स स्पेशल

तर अध्यक्षीय समारोप करताना प्रा. प्रभाकर शिंदे यांनी पालकांना विश्वास दिला की, छात्रालयामध्ये विद्यार्थ्यांची योग्य ती काळजी घेतली जाईल आणि त्यांच्या आरोग्य, शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत आवश्यक ती आर्थिक मदतही करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिस्तीचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत तसेच छात्रालयातील वास्तव्याबाबत अधीक्षकांच्या सातत्याने संपर्कात राहावे, असे आवाहन त्यांनी केले. पालकांकडून प्राप्त होणाऱ्या विधायक सूचना आणि आवश्यक बदलांचे संस्था नेहमीच स्वागत करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधीक्षिका सौ. वर्षा गोरिवले यांनी केले. तर संस्थेचे सदस्य रवींद्र गोरिवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg