loader
Breaking News
Breaking News
Foto

माणगावमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्याप ’जैसे थे’; नवीन बायपासचे काम पुन्हा लटकले

संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, आता खारपाडा टोल सुरु करून कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झाला आहे. दुसरीकडे, याच महामार्गावरील इंदापूर आणि माणगाव बायपासचे काम अद्याप अर्धवट अवस्थेत असल्याने दररोज दोन्ही बाजूंना १०-१० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागत आहेत. ऐन पावसाळ्यात आणि आगामी गणेशोत्सवात कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य वाहनधारकांसह एसटीने प्रवास करणारे प्रवासी, अपघातग्रस्त आणि तातडीच्या वैद्यकीय उपचारासाठी मुंबईला जाणार्‍या रुग्णांना बसत आहे. या कोंडीमुळे वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्ण रस्त्यातच दगावल्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत. मात्र, याची दखल ना प्रशासकीय अधिकार्‍यांकडून घेतली जात आहे ना लोकप्रतिनिधींकडून. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना वालीच उरला नसल्याचे चित्र आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर शहरात होणार्‍या कोंडीला स्थानिक पातळीवरील बेशिस्तही कारणीभूत आहे. महामार्गाच्या बाजूला बसणारे फळ-भाजी विक्रेते, रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार यांच्या बेशिस्तीमुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. कारवाई कोणी करायची? शेवटी प्रश्न मतांचा असल्याने राजकीय पुढारीही यावर मौन बाळगून आहेत. मंत्र्यांच्या दौर्‍यावेळी पुढे-मागे पोलिसांच्या गाड्या असल्याने त्यांना या कोंडीचा त्रास होत नाही, त्यामुळे सत्ताधारी पक्षातील पुढारी या समस्येवर चकार शब्दही बोलत नसल्याचा संताप प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. महामार्गाच्या मूळ रुंदीचा आणि साईड पट्ट्यांचा अभ्यास राष्ट्रीय महामार्ग विभागाला आहे. जर हायवेच्या बाजूच्या या पट्ट्यांवरील अतिक्रमण पूर्णपणे हटवून रस्ता मोकळा केला, तर येथील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकते, अशी जाणीव अधिकार्‍यांनाही आहे. मात्र, राजकीय दबावापोटी राष्ट्रीय महामार्ग विभाग कोणतीही ठोस कारवाई करण्यास धजावत नसल्याने ही समस्या कायम आहे.

टाईम्स स्पेशल

माणगाव आणि इंदापूर बायपासवरील पुलांची कामे अद्याप प्रलंबित असून, ती पूर्ण होण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. पावसाळा सुरु झाल्याने आता ही कामे तातडीने पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सवात चाकरमान्यांना मुख्य शहरातूनच प्रवास करावा लागणार आहे. यावर उपाय म्हणून प्रशासनाने बायपासच्या अर्धवट रस्त्याची तातडीने डागडुजी करून, गणेशोत्सवापुरती या मार्गावरुन एकेरी वाहतूक सुरु करावी. जर ही एकेरी वाहतूक सुरु झाली, तर चाकरमान्यांची कोंडीतून मोठी सुटका होऊ शकते. मात्र, यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग, स्थानिक पोलीस, जिल्हा वाहतूक शाखा आणि नगरपंचायत यांच्यात योग्य समन्वय आणि लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg