loader
Breaking News
Breaking News
Foto

​जनतेच्या जिवाशी खेळणारा '९९% पूर्ण' महामार्ग! पहिल्याच पावसात ठेकेदाराचे पितळ उघडे; सत्ताधाऱ्यांचे दावे ठरले 'गाजर'!

मकरंद सुर्वे / संगमेश्वर :दरवर्षीप्रमाणे यंदाही "येणार येणार" म्हणत पावसाने सोमवारी दुपारपासून तालुक्यात दमदार एन्ट्री घेतली. पण, या पहिल्याच पावसाच्या दणक्याने मुंबई-गोवा महामार्ग ठेकेदाराच्या 'नियोजनशून्य' कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत. महामार्गाचे काम ९९ टक्के पूर्ण झाल्याचा ढोल बडवणाऱ्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दाव्यांमधील फोलपणा या पहिल्याच पावसाने उघडा पाडला आहे. विकासाच्या बाता मारणाऱ्यांमुळे जनतेला सहन करावा लागणारा हा जीवघेणा छळ आता अत्यंत संतापजनक ठरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​"दुरून डोंगर साजरेच दिसतात, जवळ गेल्यावरच आजूबाजूला काँटे किती आहेत ते समजते," या म्हणीचा प्रत्यय सध्या महामार्गावरून प्रवास करताना नागरिकांना येत आहे. महामार्ग चकाचक झाल्याच्या जाहिराती ठोकणाऱ्यांनी एकदा प्रत्यक्ष जमिनीवर उतरून परिस्थिती पाहावी. रस्ता बनवताना पाणी जाण्यासाठी योग्य निचरा यंत्रणा न केल्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचून त्याला महापुराचे स्वरूप आले होते. या कृत्रिम नदीतून मार्ग काढताना वाहनचालकांना अक्षरशः मृत्यूच्या छायेत आणि जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत होती.भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे ती कोळंबे येथून परचुरी पुलाकडे जाणाऱ्या सेवा रस्त्याची. परचुरी भागात माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्याने, या भागातील मुलांना प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण करावे लागते. मात्र, पुढील माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी त्यांना कोळंबे, संगमेश्वर किंवा देवरुख गाठावे लागते. या प्रवासासाठी विद्यार्थ्यांना गावाबाहेर पडून थेट ओव्हरब्रिजच्या खालून जाणाऱ्या सेवामार्गावर यावे लागते आणि येथूनच त्यांचा पुढचा प्रवास सुरू होतो.परंतु, पहिल्याच पावसात या ओव्हरब्रिजखाली गुडघाभर पाणी साचून , ते थेट नदीच्या वेगवान प्रवाहाप्रमाणे वाहत होते . संगमेश्वर हे तालुक्याचे मुख्य केंद्र असल्याने इथली बाजारपेठ, बँका आणि शासकीय कामांसाठी नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. त्यातच शाळा-कॉलेजला जाणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना याच जीवघेण्या प्रवाहातून आणि गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत होती . निष्पाप विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचा हा अधिकार ठेकेदाराला कुणी दिला? एखादा विद्यार्थी या प्रवाहात वाहून गेला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?, असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत.

टाइम्स स्पेशल

महामार्गाच्या कामात एवढ्या गंभीर त्रुटी उघड्या पडलेल्या असताना, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी नक्की कोणासाठी काम करत आहेत? असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी लाटून जनतेच्या माथी निकृष्ट दर्जाचे काम मारणाऱ्या ठेकेदार कंपनीवर कारवाई करण्याचे सोडून प्राधिकरण विभाग डोळे झाकून बसला आहे. प्रत्यक्षात जमिनीवर काय परिस्थिती आहे, हे पाहण्याची तसदी न घेता हे अधिकारी केवळ ठेकेदाराने सादर केलेल्या कागदी घोड्यांवर विसंबून 'ऑल वेल'चे प्रमाणपत्र देत आहेतकी काय?. निकृष्ट दर्जाच्या कामाकडे जाणीवपूर्वक काणाडोळा करणाऱ्या या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे आणि ठेकेदार कंपनीचे नक्की कोणते 'अर्थपूर्ण' साटेलोटे आहे, याची चौकशी झालीच पाहिजे अशी संतप्त जनतेतून चर्चा आहे.. जनतेच्या कररूपी पैशांवर डल्ला मारून वातानुकूलित केबिनमध्ये बसणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे उद्या जर एखाद्या विद्यार्थ्याचा किंवा वाहनधारकाचा जीव गेला, तर महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी संतप्त मागणी आता संगमेश्वर तालुक्यातील जनतेतून होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

कोळंबे-परचुरी सेवा रस्त्याला नदीचे स्वरूप, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg