loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा पूर्व भागात नागरिकांची पाण्यासाठी वणवण, पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्याच्या पूर्व भागातील पालू परिसर पुन्हा एकदा तीव्र पाणीटंचाईच्या विळख्यात सापडला असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागत आहे. कडक उन्हाळा, असल्यामुळे विहीरी आटू लागल्या आहेत. आटत चाललेले जलसाठे आणि मर्यादित पाणीपुरवठा यामुळे पालू, हुंबरवणे आणि चिंचुर्टी येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी दाही दिशांना वणवण करावी लागत आहे. जलजीवन मिशनच्या विहिरीवर संपूर्ण गावांचा आधार असून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ ग्रामपंचायतीवर आली आहे. पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना दूरच्या जलसाठ्यांकडे पायपीट करावी लागत असून काही जण खासगी टँकर किंवा वाहनांद्वारे पाणी विकत आणत आहेत. दुर्गम आणि डोंगराळ भौगोलिक परिस्थितीमुळे डिसेंबर-जानेवारीपासूनच येथील पाणीसाठे कमी होऊ लागतात. जलजीवन मिशन योजनेमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी एप्रिल आणि मे महिन्यात पुन्हा टंचाईचे संकट उभे राहत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरवर्षीची अशीच अवस्था असताना प्रशासन मात्र बेफिकीर असल्याची नागरिकांची भावना आहे. पालू गावाला गेल्या दोन महिन्यांपासून जलजीवन मिशनच्या विहिरीतून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. हुंबरवणे आणि चिंचुर्ती येथेही परिस्थिती गंभीर असून माचाळ येथून ग्रॅव्हिटीद्वारे पाणी आणून पुरवठा केला जात आहे. मात्र उपलब्ध पाणी अपुरे पडत असल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. गावात सुरू असलेल्या तळी प्रकल्पातील पाण्यावरही काही प्रमाणात तहान भागवली जात आहे. लांजा तालुक्यातील चिचुर्टी, हुंबरवणे, पालू, कोचरी, केळवली, बोरीवले, हर्दखळे, हसोळ, गोविळ या गावांसह पश्चिम भागातील काही गावांनाही दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यंदा परिस्थिती तुलनेने नियंत्रणात असली, तरी उन्हाच्या तीव्रतेमुळे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या गावांतील जलसाठे झपाट्याने कमी होत आहेत. परिणामी नागरिकांना मर्यादित पाण्यावर दिवस काढावे लागत आहेत.

टाईम्स स्पेशल

या पाण्याच्या गुणवत्तेबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत. दरम्यान, या कायमस्वरूपी समस्येवर उपाय म्हणून पालू परिसरात धरण अथवा पाझर तलाव उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. अखेर प्रशासनाने या मागणीला हिरवा कंदील दिला असून लघु पाटबंधारे विभागाने पालू धरण प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पाचे भूमिपूजन आमदार किरण सामंत यांच्याहस्ते पार पडले. या धरणामध्ये २२४४.१५ दशलक्ष लिटर पाणीसाठा करण्याचे नियोजन असून सुमारे १४७ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. बंदिस्त कालव्यांद्वारे पालू परिसरातील गावांना पाणीपुरवठा करण्याची योजनाही आखण्यात आली आहे. मात्र हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी चार ते पाच वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे बोलले जात असून तोपर्यंत ग्रामस्थांना पाण्यासाठीची वणवण भटकावे लागणार असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. मात्र लांजा तालुक्यात दरवर्षी निर्माण होणारी पाणी टंचाईग्रस्त गावांचे प्रमाण कमी झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg