loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणमध्ये 'शार्क आणि पाकट' माशांच्या संवर्धनासाठी कार्यशाळेचे आयोजन

मालवण (प्रतिनिधी) - समुद्री परिसंस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या शार्क (मुशी) आणि रे (पाकट) माशांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी मालवणमध्ये एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 'दक्षिण फाउंडेशन' या संस्थेमार्फत १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत दांडेश्वर मंदिर, मालवण येथे ही कार्यशाळा संपन्न होणार आहे. सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर गेल्या काही वर्षांत येथील शार्क आणि पाकट (Rays) प्रजातींच्या अधिवासात मोठी घट झाली आहे. या गंभीर विषयावर प्रकाश टाकण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या १५ वर्षांपासून किनारी भागातील जैवविविधता आणि मच्छिमार समुदायासाठी कार्यरत असलेली 'दक्षिण फाउंडेशन' ही संस्था या कार्यशाळेचे आयोजन करत आहे. समुद्रातील शार्क आणि पाकट माशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. या माशांचे समुद्री पर्यावरणातील महत्त्व, त्यांची बदलती संख्या आणि केंद्र सरकारने त्यांच्या संरक्षणासाठी केलेले कायदेशीर बदल यावर या कार्यशाळेत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. प्रजननावर होतोय परिणाम तज्ज्ञांच्या मते, "शार्क आणि पाकट माशांना प्रौढ होण्यासाठी बराच काळ लागतो. जर आपण लहान (जुवेनाईल) माशांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली, तर त्यांचे प्रजनन चक्र थांबते. अन्य माशांच्या तुलनेत यांची प्रजनन क्षमता (fecundity) कमी असल्याने एकदा संख्या घटली की ती भरून काढणे कठीण होते". दक्षिण फाउंडेशनचे संशोधक सांगतात की, मासेमारीच्या जाळ्यात 'बाय-कॅच' (विनाकारण सापडणारे मासे) म्हणून या माशांची शिकार होणे ही सर्वात मोठी समस्या आहे.

टाइम्स स्पेशल

पश्चिम किनारपट्टीवर शार्क आणि पाकट माशांच्या संख्येत मोठी घट आहे. आयसीएआर- सीएमएफ आरआय च्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर या माशांचे मासेमारीत सापडण्याचे प्रमाणात ३४% घट झाली आहे. २०१४ मध्ये हे प्रमाण ५,७७९ टन होते, जे २०१७ पर्यंत ३,८३२ टनांवर आले आहे. जागतिक स्तरावरही शार्क आणि पाकट माशांच्या एक तृतीयांशहून अधिक प्रजातींवर सध्या नामशेष होण्याचे संकट ओढवले आहे. मालवणच्या समुद्रातही या प्रजातींचे अधिवास प्रदूषणाने धोक्यात आले आहेत. मच्छिमारी व्यवसायावर अवलंबून असलेल्या स्थानिक समुदायाला या विषयाची तांत्रिक आणि कायदेशीर माहिती मिळावी, हा यामागचा मुख्य हेतू आहे. या कार्यक्रमात मत्स्य विभाग, कांदळवन विभाग आणि स्थानिक मच्छिमार सहकारी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. शाश्वत मच्छिमारी आणि समुद्री संपत्तीच्या जतनासाठी मालवणमधील जास्तीत जास्त मच्छिमार बांधवांनी आणि निसर्गप्रेमींनी या कार्यशाळेला उपस्थित राहावे, असे आवाहन दक्षिण फाउंडेशनच्या कार्यक्रम सहयोगी गरिमा बाग यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg