loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीतील चिरेखाण व्यवसाय ठप्प; गोव्यातील युनियनच्या मनमानीविरोधात संजू परब आक्रमक

सावंतवाडी (प्रतिनिधी) : गोवा राज्यातील 'पेडणे-बार्देश गोवा ट्रक ओनर्स असोसिएशन'च्या अन्यायकारक धोरणामुळे सावंतवाडी तालुक्यातील पारंपरिक चिरेखाण उत्खनन आणि विक्री व्यवसाय पूर्णपणे कोलमडला आहे. गोव्यातील संघटनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० चिरेखाण व्यावसायिकांना वेठीस धरल्यामुळे स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. यावर सकारात्मक तोडगा निघेपर्यंत तालुक्यातील ४० ही चिरेखाणीतून एकही गाडी गोव्यात जाणार नाही, तसेच गोव्यातील वाळू, चिरे वाहतूक करणाऱ्या गाड्या सिंधुदुर्गात आल्यास त्या रोखल्या जातील, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिला आहे. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परब पुढे म्हणाले की, गोवा आणि सिंधुदुर्गचे संबंध नेहमीच चांगले राहिले असून ते अबाधित राहावेत हीच आमची इच्छा आहे. मात्र, गोव्यातील असोसिएशनच्या भूमिकेमुळे वाद निर्माण झाले आहेत. सध्या चिरेखाण व्यावसायिकांना जीएसटी भरावा लागत असून डिझेलचे दरही वाढले आहेत, त्यामुळे त्यांना भाववाढ करणे भाग पडले आहे. असे असतानाही जिल्ह्यातील गाड्या गोव्यात घेतल्या जात नसून त्यांच्यावर बंधने घातली जात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा अन्याय दूर करण्यासाठी माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांना व्यथा मांडली जाईल. खासदार राणे यांच्या माध्यमातून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याची मागणी केली जाईल. तसेच आमदार निलेश राणे यांचा भक्कम पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांचीही भेट घेऊन चिरेखाण व्यावसायिकांशी चर्चा घडवून आणली जाईल, असे परब यांनी सांगितले. ​दरम्यान, सावंतवाडी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर जांभा दगड शेजारील गोवा राज्यात विक्रीसाठी पाठवला जातो. मात्र, मागील दोन वर्षांपासून गोव्यातील पेडणे-बार्देश ट्रक ओनर्स असोसिएशनकडून महाराष्ट्रातील वाहनधारक आणि चिरेखाण व्यावसायिकांची प्रचंड पिळवणूक सुरू आहे. सर्व मालवाहनधारकांना संघटनेचा लोगो लावण्याची सक्ती केली जात असून, गाड्या अडवून आरटीओ, पोलीस आणि माईन्स डिपार्टमेंटमार्फत जाणीवपूर्वक कारवाई करण्यास भाग पाडले जात आहे. गोवा चेकपोस्टवर गाड्या अडवून त्या रिकाम्या करून घेणे आणि चालकांना धमकावणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. या जाचामुळे सध्या गोव्यातून येणाऱ्या आणि महाराष्ट्रातील सर्व गाड्या बंद पडल्याने येथील चिरेखाण व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे.

टाईम्स स्पेशल

​एकीकडे गोव्यातील युनियनच्या जाचाला सामोरे जावे लागत असतानाच, दुसरीकडे स्थानिक पातळीवर शासकीय विभागांकडूनही चिरेखाण व्यावसायिकांची कोंडी केली जात असल्याचे समोर आले आहे. हा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने यावर अवलंबून असणाऱ्या शेकडो कुटुंबांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. त्यामुळे गोवा युनियनच्या मनमानी कारभाराला चाप लावावा आणि प्रशासकीय पातळीवरील जाचक अटी शिथिल करून न्याय द्यावा, अशी मागणी चिरेखाण व्यावसायिकांनी केली आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, चिरेखाण व्यावसायिक संघाचे प्रकाश राऊत, अमित प्रभू, मदन सातोसकर, सुशिल कामटेकर, रंजन गावडे, प्रदिप मुळीक, दिगंबर कवठणकर, प्रविण बर्वे, गिरीश परब, राजेंद्र नाईक, गंगाराम मठकर, अजित कवठणकर आदींसह तालुक्यातील चिरेखाण व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg