loader
Breaking News
Breaking News
Foto

इंधन दरवाढीविरोधात शिवसेना (उबाठा) चे लांजा तहसीलदारांना निवेदन

लांजा (संजय साळवी) - पेट्रोल, डिझेल व सीएनजी यांच्या सातत्याने होणाच्या दरवाढीच्या निषेधार्थ मंगळवारी २६ मे रोजी लांजा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांना निवेदन देण्यात आले. देशातील वाढती महागाई, इंधन दरवाढ व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरवाढी विरोधात लांजा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मंगळवारी २६ मे रोजी लांजा तहसिलदार प्रियांका ढोले यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला. लांजा तहसिलदार यांना देण्यात आलेल्या या निवेदनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने म्हटले आहे की, सध्या देशभरात पेट्रोल, डिझेल व सीएनजीच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत असून त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. खाद्यतेल, डाळी, धान्य, भाजीपाला तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमततीमुळे सामान्य जनतेचे जीवन अक्षरशः मेटाकुटीला आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आज सर्वसामान्य कुटुंबाचे मासिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. एका बाजूला रोजगाराच्या मर्यादित संधी, अपुरी मिळकत आणि आर्थिक अस्थिरता, तर दुसऱ्या बाजूला वाढती महागाई यामुळे सर्वसामान्य जनता हतबल झाली आहे. या महागाईच्या काळात कुटुंबाचा गाडा चालविताना जनतेला गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गृहकर्ज, वाहनकर्ज व इतर कर्जाचे मासिक हप्ते भरणे कठीण झाले आहे. मुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च परवडेनासा झाला आहे. त्याचबरोबर कुटुंबाच्या आरोग्यावरील खर्च करताना नागरिक आर्थिकदृष्ट्या कोसळत आहेत. पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढून सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. दैनंदिन जीवनातील किराणा, तेल, डाळी, दूध, भाजीपाला यांसारख्या आवश्यक वस्तू सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहेत असेही या निवेदनात म्हटले आहे. सरकारने "महागाई नियंत्रणात आहे" असे सांगण्यापेक्षा प्रत्यक्षात जनतेला दिलासा देणारे निर्णय घेणे आवश्यक आहे. अन्यथा सामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे पूर्णपणे मोडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल व सीएनजी दरवाढ तात्काळ मागे घ्यावी. तसेच खाद्यतेल, डाळी व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.

टाईम्स स्पेशल

तसेच साठेबाजी व कृत्रिम दरवाढ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून सर्वसामान्य नागरिकांना महागाईपासून दिलासा द्यावा अशी मागणी करताना या मागण्या पूर्ण न केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जनतेसाठी तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. दरम्यान, सदरचे निवेदन निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी यांनी स्वीकारले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, शिवसहकार संपर्कप्रमुख सुधीर मोरे, शिवसेना लांजा तालुका प्रमुख युवराज हांदे, शहरप्रमुख मोहन तोडकरी, महादेव खानविलकर, अशोक गुरव, विश्वास मांडवकर, सुभाष रामाणे, चंद्रकांत शिंदे, राजेंद्र घडशी, विलास लाखण, अर्जुन जाधव, संजय नावाथे, पंढरी गुरव, कृष्णा वीर, लक्ष्मण मोर्ये यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg