loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्ह्यात डेंग्यू आणि मलेरियावर नियंत्रण; आरोग्य विभागाच्या मोहिमेला मोठे यश

​रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या वर्षभरात राबवण्यात आलेल्या प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे डेंग्यू आणि मलेरिया सारख्या कीटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य विभागाला अभूतपूर्व यश आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनबद्ध कामामुळे रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली असून, यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ​जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी दिलेल्या सांख्यिकीय माहितीनुसार, २०२४ मध्ये जिल्ह्यात डेंग्यूचे २५६ रुग्ण आढळले होते. मात्र, आरोग्य विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमांमुळे २०२५ मध्ये ही संख्या लक्षणीयरीत्या घटून केवळ ४२ वर आली आहे. मलेरियाच्या बाबतीतही अशीच समाधानकारक स्थिती पाहायला मिळत आहे. २०२४ मध्ये मलेरियाचे ८० रुग्ण होते, तर २०२५ मध्ये ही संख्या ११५ दिसत असली तरी आरोग्य विभागाने याबाबत एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली आहे. हे सर्व ११५ रुग्ण मूळचे रत्नागिरीचे रहिवासी नसून, ते मुंबई किंवा इतर जिल्ह्यांतून कामासाठी आलेले किंवा प्रवासाचा इतिहास असलेले नागरिक आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्थानिक पातळीवर मलेरियाचा प्रादुर्भाव पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने ठामपणे सांगितले आहे. ​या यशामागे आरोग्य सेवक, आरोग्य निरीक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांचे मोलाचे योगदान आहे. विशेष म्हणजे, CHRI, GCPL CSR आणि PKC यांच्या सहकार्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते, ज्याचा सकारात्मक परिणाम सर्वेक्षणाच्या आणि उपचारांच्या गुणवत्तेवर दिसून आला आहे. ​जिल्ह्यात '१२ कलमी कार्यक्रमा' अंतर्गत ग्रामपंचायतींच्या माध्यमातून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली. यामध्ये साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, दर मंगळवारी 'कोरडा दिवस' पाळून पाणी साठवणुकीची भांडी स्वच्छ करणे आणि भंगार साहित्य, जुन्या टायरची विल्हेवाट लावण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवणे यांसारख्या कामांचा समावेश होता.

टाईम्स स्पेशल

तसेच पिण्याच्या पाण्यात टी.सी.एल. पावडरचा वापर आणि शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळ्या बसवण्यासारख्या बारीक पण महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्यात आले. ​जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपल्या परिसरातील डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच, ताप किंवा थंडी जाणवल्यास घरगुती उपचार न करता त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी, जेणेकरून पुढील धोका टाळता येईल. प्रशासनाच्या या सतर्कतेमुळे रत्नागिरी जिल्हा आता डेंग्यू आणि मलेरियामुक्तीच्या दिशेने वेगाने पाऊल टाकत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg