loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवरील संगमेश्वर बाजारपेठ परिसरात सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात रखडल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संगमेश्वर येथील सोनवी पुलाची एक मार्गीका ३१ मार्चपूर्वी सुरू करण्याचे दिलेले आश्वासन फोल ठरल्याने गेले काही दिवस संगमेश्वर सोनवी चौक येथे अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत आहे. आज १ मे पासून सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने या मार्गावर वाहनांची संख्या वाढवून कमालीची वाहतूक कोंडी होत असल्याचे पाहायला मिळाले. वाहतूक शाखेच्या पोलिसांचा अभाव असल्याने वाहन चालक होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आणि संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संगमेश्वर बाजारपेठेत देखील असंख्य वाहने एकाच वेळी आल्याने वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. सकाळी सहा वाजता सुरू झालेली ही वाहतूक कोंडी दुपारी एक वाजला तरीही सुरूच होती. यातच आज सकाळी ५:३० च्या दरम्याने संगमेश्वर देवरुख मार्गावर बुरंबी करंबेळे दरम्यान एक जुनाट वटवृक्ष उन्मळून पडल्याने या मार्गावर देखील वाहतूक ठप्प झाली. राज्य परिवहन महामंडळाच्या बस बुरंबी सोनवडे कुसुम मार्गे देवरुख अशा वळवण्यात आल्या. अचानक संगमेश्वर येथील वाहतूक कोंडी आणि संगमेश्वर देवरुख रोडवर बुरंबी करंबेळे दरम्यान वडाचे झाड कोसळून झालेली वाहतूक कोंडी यामुळे वाहन चालक कमालीचे त्रस्त झाले.

टाईम्स स्पेशल

संगमेश्वर परिसरातील सर्व कामे पूर्ण होण्यास अजून वर्षभराचा कालावधी लागणार आहे. या परिसरातील वाहतूक कोंडी, ठेकेदाराच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे होणारे वाढते अपघात ही बाब चिंताजनक बनली आहे. चौपदरीकरण सुरू असताना पर्यायी रस्ते (डायव्हर्जन) मातीचे बनवण्यात आले असून, त्यावरून वाहने घसरून अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी सर्विस रोडच तयार नसल्याचे दिसून येत आहे, तर जिथे आहेत तेही पूर्णपणे मातीचे असल्याने पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच संतप्त झालेल्या संगमेश्वर येथील स्थानिक ग्रामस्थ आणि वाहन चालकाने अचानक रास्ता रोको करून ठेकेदाराला वेगाने कामे पूर्ण न केल्यास पाच मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महामार्गावर ठिकठिकाणी मातीचे ढिगारे टाकलेले असून दिशादर्शक फलकांचा अभाव असल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. बांधकाम सुरू असतानाही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. चौपदरीकरणादरम्यान संरक्षण भिंत उभारणे अपेक्षित असताना त्या कामालाही सुरुवात झालेली नाही. राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने लक्ष घालून कामे पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg