loader
Breaking News
Breaking News
Foto

आम. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला मोठे यश, अनुस्कुरा घाट मार्गाच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर

रत्नागिरी : आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या विशेष पाठपुराव्याला मोठे यश आले असून, राजापूर तालुक्यातील अत्यंत कळीचा आणि नेहमीच चर्चेत राहिलेल्या अनुस्कुरा घाट मार्गाच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेच्या गर्तेत अडकलेल्या या मार्गासाठी आमदार सामंत यांनी शासनाकडे सातत्याने मागणी लावून धरली होती. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अखेर अनुस्कुरा ते ओणी या २५ किलोमीटरच्या अत्यंत खराब झालेल्या रस्त्याला नवसंजीवनी मिळणार असून, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा महत्त्वाचा दुवा आता खड्डेमुक्त होण्याच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. ​अनुस्कुरा घाट हा केवळ एक रस्ता नसून राजापूरच्या अर्थव्यवस्थेची आणि दळणवळणाची मुख्य वाहिनी आहे. मात्र, गेल्या काही काळापासून अनुस्कुरा ते ओणी या ३३ किलोमीटरच्या पट्ट्यात रस्त्याची पार चाळण झाली होती. ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे, उखडलेले डांबर आणि उडणारी धूळ यामुळे वाहनचालकांचे कंबरडे मोडले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेषतः पावसाळ्यात या घाटातून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे भयावह स्वरूप प्राप्त झाले होते. स्थानिक नागरिक आणि व्यापारी वर्गातून या रस्त्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या जनक्षोभाची दखल घेत आमदार भैया सामंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या मार्गाच्या मजबुतीकरणासाठी ताकदीने पाठपुरावा केला. ​मंजूर झालेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून २५ किलोमीटर अंतराचे डांबरीकरण आणि मजबुतीकरण केले जाणार आहे. सध्या या कामाचा तांत्रिक प्रस्ताव मुख्य अभियंत्यांच्या अंतिम स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला आहे. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच तत्काळ निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, येत्या पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, जेणेकरून पावसाळ्यात प्रवाशांना होणारा प्रचंड त्रास वाचवता येईल.

टाइम्स स्पेशल

​या निधीच्या मंजुरीमुळे केवळ रस्ताच दुरुस्त होणार नाही, तर या भागातील व्यापार, पर्यटन आणि आपत्कालीन वाहतुकीलाही मोठी गती मिळणार आहे. रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा हा सर्वात जवळचा मार्ग असल्याने इंधन आणि वेळेची मोठी बचत होणार आहे. आमदार भैया सामंत यांनी दाखवलेल्या या राजकीय इच्छाशक्तीमुळे राजापूरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता लक्ष लागले आहे ते म्हणजे, पावसाळ्याच्या पहिल्या सरी कोसळण्यापूर्वी हा २५ किलोमीटरचा टप्पा चकाचक होऊन प्रवाशांच्या सेवेत कधी दाखल होतो याकडे. अनुस्कुरा घाटाचा हा रखडलेला विकास आता 'भैया' यांच्या पुढाकारामुळे गती घेताना दिसत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg