loader
Breaking News
Breaking News
Foto

गोव्यातील किल्ल्याचे ‘खेमसावंत भोसले किल्ला’ असे नामकरण!

डिचोली (प्रतिनिधी) : राज्यातील अनेक किल्ले, मंदिरे व ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्याची संधी मला गेल्या काही वर्षांत मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो! साखळी येथील पुरातन ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन करताना हा किल्ला खर्‍या अर्थाने सांस्कृतिक केंद्र बनविण्याचा संकल्प पूर्णत्वास येत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. साखळी येथील ऐतिहासिक पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. दरम्यान या किल्ल्याचे नामकरण खेमसावंत भोसले किल्ला असे करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. पुरातत्त्व खात्यातर्फे सुमारे सव्वा तीन कोटी रुपये खर्चून या किल्ल्याचे संवर्धन व नूतनीकरण करण्यात आले आहे. २०१९ साली या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. किल्ल्याच्या लोकार्पण सोहळ्यास नगराध्यक्षा सिद्धी प्रभू, उपनगराध्यक्ष दयानंद बोर्येकर, पुरातत्त्व खात्याचे संचालक डॉ. निलेश फाळदेसाई, जिल्हा सदस्य सुंदर नाईक, सरपंच गौरवी नाईक, महेश सावंत, आनंद काणेकर, मिलिंद रमाणी, प्रियांका डायस आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणात गोव्याच्या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, गोवा म्हणजे केवळ समुद्रकिनारे आणि चर्चेस नव्हेत, तर राज्यातील अनेक ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि पुरातन वास्तूही गोव्याची खरी ओळख आहेत. या वारशाचे जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. साखळीच्या या पुरातन किल्ल्यास खेम सावंत भोसले किल्ला असे नामकरण करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. त्यांनी सांगितले की, हा किल्ला भविष्यात सांस्कृतिक, शैक्षणिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. साखळी हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाने समृद्ध शहर आहे. येथे अनेक पर्यटनस्थळे जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहेत. देशी-विदेशी पर्यटक येथे भेट देतात. हा किल्ला म्हणजे आपल्या इतिहासाचे जिवंत प्रतीक आहे. येथे राष्ट्रीय नाट्य विद्यालय, इंदिरा गांधी राष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र, वाचनालय, विरंगुळा केंद्र तसेच बालोद्यान यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देत या परिसराला सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा आमचा मानस आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. या ठिकाणी आणखी काही महत्त्वाची विकासकामे प्रस्तावित असून त्याचा आराखडाही तयार असल्याची माहिती त्यांनी दिली. इतिहास जतन करताना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

पुरातत्त्व खात्याचे संचालक डॉ. निलेश फाळदेसाई यांनी प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, साखळी किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करताना मूळ ऐतिहासिक रचना अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या किल्ल्याच्या पुनर्बांधणीमुळे पुढील पिढीला स्थानिक इतिहासाची ओळख होण्यास मदत होणार आहे. नगराध्यक्षा सिद्धी प्रभू यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, साखळी शहरासाठी हा अत्यंत ऐतिहासिक क्षण असून किल्ल्याचे नूतनीकरण हे शहराच्या स्वप्नपूर्तीचे प्रतीक आहे. या प्रकल्पामुळे साखळीच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी मिलिंद रमाणी, प्रियांका डायस आदींचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. साखळीतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच इतिहासप्रेमींच्या मोठ्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg