loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतल्या डिजिटल अरेस्ट प्रकरणाची पाळेमुळे दिल्लीत !पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी ! आरोपी अटकेत!!

बेंगलोर पोलीस आणि नवी दिल्लीतील सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीला 'डिजिटल अरेस्ट'ची भीती घालत तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांना गंडवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा रत्नागिरी सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाचा तांत्रिक मागोवा घेत पोलिसांनी दिल्लीतून गगनदीप भारद्वाज (रा. नोएडा, दिल्ली) या मुख्य आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या खळबळजनक घटनेची सविस्तर माहिती अशी की, रत्नागिरीतील फिर्यादी यांचे मुंबईतील माटुंगा येथील कॅनरा बँकेत खाते आहे. या खात्यातून ३ कोटी रुपयांचा फ्रॉड झाला असून, तुम्ही यामध्ये संशयित आहात अशी भीती आरोपींनी फिर्यादीला घातली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच आपण बेंगलोर पोलीस आणि सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे सांगून त्यांनी फिर्यादीला 'डिजिटल अरेस्ट' केले असल्याचे धमकावले. या कथित चौकशी आणि कारवाईची भीती दाखवून आरोपींनी ४ नोव्हेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत फिर्यादीकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येईपर्यंत फिर्यादी यांनी तब्बल १ कोटी २३ लाख रुपये आरोपींच्या खात्यावर ट्रान्सफर केले होते. याप्रकरणी रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३१८(२), ३१८(४), ३१९(२), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) २००० च्या कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य आणि संवेदनशीलता ओळखून रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण केले. दिल्ली आणि नोएडा परिसरात स्थानिक बातमीदार आणि तांत्रिक मागोवा घेत पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपी गगनदीप भारद्वाज याला ताब्यात घेतले. त्याला रत्नागिरीत आणून न्यायालयासमक्ष हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

टाइम्स स्पेशल

ही कामगिरी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार जाधव, पोलीस हवालदार संदीप नाईक आणि पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कदम यांच्या पथकाने केली. या मोठ्या कारवाईनंतर रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. कोणतेही पोलीस, सीबीआय अधिकारी किंवा नॅशनल सिक्युरिटी विभागाचे नाव सांगून बँक अकाऊंट अथवा सिमकार्डचा गैरवापर झाल्याची भीती घालत असल्यास नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg