loader
Breaking News
Breaking News
Foto

भोंगळ कारभाराला कंटाळून तळवडे येथील ग्रामस्थांची महावितरण कार्यालयावर धडक

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - महावितरणच्या भोंगळ कारभाराला कंटाळून तळवडे येथील शेकडो ग्रामस्थांनी मंगळवारी रात्री थेट लांजा येथील महावितरण कार्यालयावर धडक देत तीव्र संताप व्यक्त केला. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, त्यातून विद्युत उपकरणांचे होणारे नुकसान, पाणीपुरवठ्यावर होणारा परिणाम आणि अधिकार्‍यांची उदासीनता यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास कार्यालयात धडक दिली. लांजा तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून वीजपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना सततच्या खंडित वीजपुरवठ्याचा फटका बसत आहे. अशातच तळवडे गावात गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत अनेकदा तक्रारी करूनही संबंधित अधिकार्‍यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. मंगळवारी रात्री मोठ्या संख्येने ग्रामस्थ महावितरण कार्यालयात दाखल झाले. मात्र, तक्रारींचे कारण ठरलेले संबंधित सहाय्यक अभियंता कार्यालयात उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांचा संताप अधिकच वाढला. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे लक्षात येताच महावितरण प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले आणि श्रेणी पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांची समजूत काढली. त्यांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी संयमाची भूमिका घेत चर्चा करण्यास सहमती दर्शविली.यानंतर लांजा महावितरणचे सहाय्यक अभियंता निलेश कुलकर्णी यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

टाईम्स स्पेशल

यावेळी ग्रामस्थांनी वारंवार होत असलेल्या वीज खंडितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तळवडे विभागातील संबंधित सहाय्यक अभियंता तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार केली. तसेच नागरिकांशी योग्य संवाद साधून समस्या सोडविण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. सहाय्यक अभियंता निलेश कुलकर्णी यांनी ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, तब्बल दीड तास तळवडे ग्रामस्थ महावितरण कार्यालयात ठिय्या देऊन बसले होते. या घटनेमुळे तालुक्यातील वीज समस्येचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून महावितरण विरोधातील नाराजी उघडपणे समोर आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg