loader
Breaking News
Breaking News
Foto

"लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या समन्वयातूनच ग्रामस्थांच्या तक्रारी दूर होतील" – माधवी गीते

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : "लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम केल्यास ग्रामस्थांच्या तक्रारी कमी होतील. आपण जनतेचे सेवक आहोत. शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यातूनच काम केल्याचे खरे समाधान मिळते," असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या माधवी मनोहर गीते यांनी केले. मुचरी जिल्हा परिषद प्रभाग समितीची बैठक आंबेड बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सभागृहात उत्साहात पार पडली. प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माधवी गीते होत्या. यावेळी पंचायत समिती सभापती शर्वरी वेल्ये, उपाध्यक्ष आरुषी घवाळी, पंचायत समिती सदस्य सुहास मांयगडे, माभळे पंचायत समिती गणातील प्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बैठकीत जलजीवन मिशन संदर्भातील तक्रारींवर सविस्तर चर्चा झाली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांनी मुचरी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा आयोजित करून त्यामध्ये पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदारांनी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या समस्या ऐकून त्यांचे तातडीने निराकरण करावे, अशा सूचना अध्यक्षांनी दिल्या. शिक्षण विभागाच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभाग, पालक आणि ग्रामस्थांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी परीट यांनी मराठी शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावत असल्याचे सांगत शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतील तालुक्याचा निकाल समाधानकारक लागल्याची माहिती दिली.

टाईम्स स्पेशल

बैठकीस महावितरण विभागाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने माधवी गीते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांना समज देऊन खुलासा मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकाराबद्दल ग्रामस्थांनीही नाराजी व्यक्त केली. यावेळी एसटी विभाग, ग्रामीण व सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, शिक्षण विभाग, महावितरण, कृषी, पशुसंवर्धन तसेच मुख्यमंत्री समृद्धी पंचायत अभियान आदी विषयांवर चर्चा झाली. ग्रामस्थांनी विविध विकासकामे व स्थानिक समस्यांबाबत निवेदने सादर केली. यावेळी माधवी गीते यांनी पालकमंत्री तसेच संबंधित लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही दिली. बैठकीच्या शेवटी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील शासकीय योजनांची माहिती देत नागरिकांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg