loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेत महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी

रत्नागिरी : तालुक्यातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, तक्रारींसाठी महावितरणच्या कर्मचार्‍यांकडून फोन न उचलणे, निकृष्ट दर्जाचे वीज खांब तसेच अर्धवट आणि सदोष भूमिगत वीजवाहिन्यांची कामे यावरून रत्नागिरी पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेत महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. ‘केवळ अहवाल नको, प्रत्यक्ष काम करून दाखवा, अशा शब्दांत पंचायत समितीचे सभापती प्रवीण पांचाळ यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना खडसावले. जिल्हा परिषदेच्या लोकनेते शामराव पेजे सभागृहात शुक्रवारी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती प्रवीण पांचाळ होते. उपसभापती गजानन धनावडे, गटविकास अधिकारी चेतन शेळके तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. सभेत सदस्य विद्या बोंबले, वैभव पाटील यांच्यासह अनेक सदस्यांनी पावसाळ्यातही वारंवार खंडित होणार्‍या वीजपुरवठ्याबाबत संताप व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तक्रारी करण्यासाठी संपर्क साधला असता महावितरणचे कर्मचारी फोन उचलत नसल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. यावर सभापती व उपसभापती यांनी संबंधित कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना देत, नागरिकांशी समन्वय ठेवण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले. कोतवडे, कर्ला, मिर्‍या आदी किनारपट्टी भागांमध्ये सुरू असलेल्या भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामांबाबतही सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी कामे अर्धवट असून काही ठिकाणी ती धोकादायक पद्धतीने करण्यात आल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला. यावर अधिकार्‍यांनी सर्वेक्षण करून अहवाल देण्याचे सांगताच सभापतींनी, ‘अहवाल नको, प्रत्यक्ष काम पूर्ण करा,’ असा स्पष्ट इशारा दिला. दरम्यान, सभेत कृषी विभागाच्या योजनांचाही आढावा घेण्यात आला. सिंधुरत्न योजनेअंतर्गत ५१ प्रस्तावांना तांत्रिक, तर ५७ प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती देण्यात आली.

टाईम्स स्पेशल

मागेल त्याला काजू योजनेसाठी ९५० चे उद्दिष्ट असताना आतापर्यंत ११०० प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. तसेच भातपीक स्पर्धेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. फळपीक विमा योजनेत आंब्याच्या विमा हप्त्यात कपात झाल्याची माहिती देत उपसभापती गजानन धनावडे यांनी नुकसानभरपाईच्या वेळी विमा कंपन्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. खरीप हंगामात खतांचा तुटवडा होऊ नये, यासाठी कृषी विभागाने नियोजन करण्याच्या सूचनाही सभापतींनी दिल्या. वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाचाही विषय सभेत गाजला. गवेरेडे, माकडे आणि बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत असल्याचे सदस्यांनी सांगितले. नुकसानभरपाई मिळण्यास होणारा विलंब थांबविण्याबरोबरच उपद्रवी वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सदस्यांनी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg