loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी ऐतिहासिक पाऊल, ६५ कोटी ७७ लाख निधी मंजूर

रत्नागिरी : लांजा शहरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल उचलले गेले आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत लांजा नगरपंचायतीच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पाला अखेर महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या भव्य प्रकल्पासाठी तब्बल ६५ कोटी ७७ लाख रुपयांचा (६५.७७ कोटी) निधी मंजूर करण्यात आला असून, या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय १४ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे. लांजा शहराच्या विकासात मैलाचा दगड ठरणार्‍या या प्रकल्पासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी विशेष वजन वापरले, तर आमदार किरण सामंत यांनी मंत्रालयीन पातळीवर सातत्यपूर्ण आणि अथक पाठपुरावा केला होता. त्यांच्या या संयुक्त आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळेच लांजावासियांना हा हक्काचा मोठा निधी मिळवता आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या एकूण ६५.७७ कोटी रुपयांच्या वित्तीय आराखड्यात विविध स्तरांवरून निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये केंद्र शासनामार्फत ५० टक्के म्हणजेच ३२.८८ कोटी रुपयांचे अनुज्ञेय अनुदान मिळणार आहे. तसेच राज्य शासनाचा हिस्सा ४५ टक्के असून त्या माध्यमातून २९.६० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. उर्वरित ५ टक्के हिस्सा म्हणजेच ३.२९ कोटी रुपये लांजा नगरपंचायतीला आपल्या स्तरावरून उभारावे लागणार आहेत. मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे विभाग यांनी यापूर्वीच ९ ऑगस्ट २०२४ रोजी या प्रकल्पाला तांत्रिक मान्यता दिली होती, ज्यावर आधारित ३ जुलै २०२६ रोजीच्या राज्यस्तरीय तांत्रिक मान्यता समितीच्या बैठकीत अंतिम मंजुरीची मोहर उमटवण्यात आली.

टाईम्स स्पेशल

हा संपूर्ण प्रकल्प येत्या १२ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याचे बंधनकारक करण्यात आले असून, लांजा नगरपंचायत या कामाची मुख्य कायान्वयन यंत्रणा असणार आहे. या अंतर्गत पन्हाळे धरण ते जलशुद्धीकरण केंद्र आणि बेनी नदी ते जलशुद्धीकरण केंद्र येथे अत्याधुनिक पंपिंग मशिनरी, ९.० एमएलडी क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प, २४५ केडब्ल्यूपी क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प, ७ नवीन पाणी साठवण टाक्या आणि ८६ हजार ३७२ मीटर लांबीची विस्तीर्ण वितरण नलिका प्रणाली उभारली जाणार आहे. या सर्वसमावेशक विकासामुळे लांजा शहराला अखंडित आणि शुद्ध पाणीपुरवठा होणार असून, शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg