loader
Breaking News
Breaking News
Foto

बीएलओ च्या कामातून आपत्तीग्रस्त गावातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना वगळावे, देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांची मागणी

मालवण (प्रतिनिधी) - निवडणूक विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या मतदार पुनःरीक्षण कार्यक्रमात शासनाकडून मतदार गणनेसाठी गावातील तलाठी, ग्रामसेवक यांना बीएलओ चे काम देण्यात आल्याने गावातील प्रशासकीय कामे ठप्प पडत आहेत. देवबागसारख्या आपत्तीग्रस्त गावातील तलाठी व ग्रामसेवक मतदार गणनेच्या कामात अडकल्याने सध्या पावसाळ्यात घडणाऱ्या आपत्तीच्या घटनांमध्ये शासकीय बाबी पूर्ण करण्यासाठी तलाठी व ग्रामसेवक उपलब्ध होत नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे बीएलओच्या कामातून आपत्तीग्रस्त गावांमधील तलाठी व ग्रामसेवक यांना वगळण्यात यावे, अशी मागणी देवबागचे सरपंच उल्हास तांडेल यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवडणूक विभागाकडून सध्या मतदार यादी विशेष सखोल पुनःरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून यासाठी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ नेमण्यात आले आहेत. यामध्ये गावातील तलाठी व ग्रामसेवक यांचाही समावेश आहे. मात्र सध्या ग्रामसेवक व तलाठी हे दिवसभर बीएलओ च्या कामात व्यस्त राहत असल्याने गावातील प्रशासकीय कामांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. विशेष करून आपत्तीग्रस्त गावांमध्ये अनेक अडचणीना सामोरे जावे लागत असल्याने याबाबत सागरी अतिक्रमणग्रस्त असलेल्या देवबाग गावचे सरपंच उल्हास तांडेल यांनी लक्ष वेधले आहे.

टाईम्स स्पेशल

देवबाग हे सागरी अतिक्रमणग्रस्त गाव असून पावसाळ्यात या गावात आपत्तीच्या विविध घटना घडत असतात. अशावेळी आपत्तीच्या घटनेचा पंचनामा करण्यासाठी तलाठी आवश्यक असतो. मात्र देवबाग गावात वादळी वाऱ्याने घडलेल्या एका दुर्घटनेचा पंचनामा करम्यासाठी तलाठी व ग्रामसेवक बीएलओ च्या कामाच्या कारणास्तव उपलब्ध होऊ न शकल्याने पंचनामा रखडला आहे, असे सरपंच उल्हास तांडेल यांनी म्हटले आहे. तसेच देवबाग गावातील रस्त्यावर पाणी साचण्याच्या प्रश्नाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला ग्रामपंचायतीतर्फे निवेदन देण्याबाबत ठराव घेण्यासाठी ग्रामसेवक उपलब्ध नसल्याने ते कामही रखडले आहे. आपत्तीग्रस्त गावांमधील प्रशासकीय अधिकारी दुसऱ्या कामात व्यस्त असल्यास आपत्तीच्या घटनेतील प्रशासकीय कामे होणार कशी असा सवाल तांडेल यांनी उपास्थित केला आहे. त्यामुळे बीएलओच्या कामातून आपत्तीग्रस्त गावातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना वगळण्यात यावे, किंवा त्यांना बीएलओच्या कामासाठी काही तासाची ड्युटी द्यावी, अशी मागणी उल्हास तांडेल यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg