loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेल वनक्षेत्रपाल कार्यालयाची जीर्ण अवस्था, वन मंत्र्याकडे आधुनिक ‌‘वन भवन' उभारण्याची मागणी

पनवेल : वनसंपदा, जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या पनवेल वनक्षेत्रपाल (संरक्षण) कार्यालयाची इमारत आज स्वतःच संरक्षणाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र समोर आले आहे. अनेक वर्षांपासून आवश्यक दुरुस्ती आणि सुविधांच्या अभावामुळे या कार्यालयाची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून, संरक्षण भिंती, छप्पर आणि पत्रे तुटल्याने संपूर्ण इमारत शेवटच्या घटका मोजत असल्याची भावना पत्रकार, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. या कार्यालयात कार्यरत अधिकारी व कर्मचारी महत्त्व सरकारी दस्तावेज जतन करून जीव मुठीत धरून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. उन्हाळा, पावसाळा किंवा कोणतेही नैसर्गिक संकट असो, वनक्षेत्राचे संरक्षण, वन्यजीव संवर्धन, वृक्षसंवर्धन, जंगलातील गस्त, वनाग्नी नियंत्रण, बेकायदा वृक्षतोड रोखणे, पर्यावरणविषयक जनजागृती, विविध शासकीय नोंदी आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण अशी अनेक महत्त्वाची कामे याच कार्यालयातून वन विभाग कर्मचारी करत आहे. पण या वर्षीही अतिवृष्टीमुळे कार्यालय पाण्यात बुडाले असून भविष्यात सरकारी नोंदी गहाळ होण्याची दाट शक्यताही वर्तवली जाते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निसर्गाचे रक्षण करणाऱ्या या विभागालाच सुरक्षित आणि सुसज्ज कार्यालय उपलब्ध नसल्याची खंत पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या वन सेवक कर्मचाऱ्यांना आजही मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत कार्यालयीन कामकाजावर तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पनवेल हे कोकणाचे प्रवेशद्वार असून आधुनिक शहराच्या वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर मानव व वन यांचं संतुलन राखण्यासाठी वनविभागाची भूमिका अधिक महत्त्वाची ठरत आहे. भविष्यात पनवेलचे भव्यदिव्य आधुनिक 'वन भवन' उभारून त्यामध्ये पर्यावरणविषयक माहिती केंद्र, वनसंपदा संग्रहालय, संशोधन व प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय, वृक्ष व वनस्पती संवर्धनाची माहिती, विद्यार्थ्यांसाठी जनजागृती उपक्रम आणि नागरिकांसाठी पर्यावरण मार्गदर्शन केंद्र उभारण्याची गरज क्रियाशील प्रेस क्लब पनवेल सचिव साबीर शेख यांनी व्यक्त केली. नवी मुंबईचे शिल्पकार तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन पनवेल वनक्षेत्रपाल (संरक्षण) कार्यालयासाठी अत्याधुनिक, सुरक्षित आणि प्रशस्त इमारतीला मंजुरी द्यावी, अशी मागणी पत्रकार, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून होत आहे.

टाईम्स स्पेशल

पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या विभागालाच सुरक्षित कार्यालय मिळणार कधी ? वनसंपदा जपणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूलभूत सुविधा देण्यासाठी शासनाने अजून किती काळ वाट पाहायची ? शहराचा नैसर्गिक वारसा जतन करणाऱ्या या विभागासाठी आधुनिक 'वन भवन' उभारण्याचा निर्णय आता तरी होणार का, असा प्रश्न पनवेलकर उपस्थित करत आहेत. वनसंवर्धन हा केवळ एका विभागाचा विषय नसून झाड,पान, वेली, वनस्पती यांच्या संशोधनातून भावी पिढ्यांच्या सुरक्षित भविष्याशी,आरोग्याशी अत्यावश्यक महत्त्व पूर्ण निगडित विषय आहे. त्यामुळे पनवेलच्या वनविभागाला सन्मानास साजेशी, सुरक्षित आणि सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे मत सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg