loader
Breaking News
Breaking News
Foto

​नगराध्यक्षा चषक जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढी मोबाईलमध्ये व्यस्त असताना, इनडोअर गेम्सना प्रोत्साहन देण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून तरुणांना मोबाईल बाजूला ठेवून मैदानात उतरण्याची आणि आपला व्यक्तिमत्त्व विकास करण्याची उत्तम संधी मिळेल. यासाठी आवश्यक सावंतवाडीचा स्पोर्ट जिमखाना अधिक सुसज्ज आणि दर्जेदार करण्यासाठी नगरपरिषदेने तातडीने नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार करावा, राज्य सरकारच्या माध्यमातून यासाठी सर्वतोपरी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी दिली. ​सावंतवाडी जिमखाना मैदानावर सावंतवाडी नगरपरिषद आयोजित स्व. पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज स्मृती जिल्हास्तरीय 'नगराध्यक्षा चषक' स्पर्धेनिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट दिली. जागतिक बॅडमिंटन दिनानिमित्त आयोजित या बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी त्यांनी स्वतः बॅडमिंटन खेळण्याचा आनंदही लुटला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उपस्थित कार्यकर्त्यांना आणि खेळाडूंना संबोधित करताना ना. नितेश राणे म्हणाले, "आम्ही आमच्या तरुणपणी नेहमी मैदानावर असायचो. खेळ आपल्याला बरेच काही शिकवतो. बुद्धिबळातून जसे डोके चालवायचे कळते, तसेच संघभावनेतून एकजुटीने कसे जिंकायचे याचा बोध मिळतो. समाजात आणि राजकारणातही खेळाडूवृत्ती असणे आवश्यक आहे. जसे खेळाडू आपला संघ जिंकवण्यासाठी प्रयत्न करतात, तसेच आपण सर्वांनी आपला जिल्हा आणि देश जिंकवण्यासाठी प्रयत्न केले, तर विकास अजिबात दूर नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक उत्तम खेळाडू आहेत. अशा स्पर्धांमधून संधी मिळाल्यास भविष्यात आपल्यातूनही विश्वनाथ आनंद किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटनपटू निर्माण होऊन ते देशाचे प्रतिनिधित्व करू शकतील. अशा गुणवंत खेळाडूंना पुढे जाण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल.

टाईम्स स्पेशल

नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोंसले यांच्या कामाचे विशेष कौतुक करत पालकमंत्री म्हणाले, आज समाजात पदावर बसलेल्या व्यक्तीचे कौतुक करण्याऐवजी केवळ टीका करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. परंतु, धीरुभाई अंबानी यांनी म्हटले होते की, 'तुम्ही यशस्वी होत आहात हे कशावरून समजायचे? जेव्हा तुमच्यावर सर्वाधिक टीका होते!' त्यामुळे टीकेकडे अजिबात लक्ष देऊ नका. वाकड्या आणि आव्हानात्मक रस्त्यावर ड्रायव्हिंग करायलाच खरी मजा येते. नगराध्यक्षांनी क्रीडा क्षेत्रात पुढाकार घेऊन उत्तम काम केले आहे, पालकमंत्री म्हणून मी आणि राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे ते म्हणाले. दरम्यान, बॅडमिंटनसोबतच इतर सर्व खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg