loader
Breaking News
Breaking News
Foto

अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात देवगडची जनता रस्त्यावर आंबा-काजू बागायतदारांचे जलसमाधी आंदोलन

आंबा-काजू बागायतदार व व्यापारी संघ, देवगड आणि अणूउर्जा प्रकल्प विरोधी संघर्ष समिती यांच्यावतीने मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी शुक्रवारी मेळावा व जलसमाधी आंदोलन आयोजित करण्यात आले. देवगडमध्ये प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प रद्द करा व नैसर्गिक आपत्ती व आस्मानी संकटामुळे नुकसान झालेल्या आंबा बागायतदारांना शासनाने हेक्टरी ५ लाख रूपये तर काजू बागायतदारांना हेक्टरी ३ लाख रूपये भरपाईपोटी मदत द्यावी, अशा प्रमुख मागण्यासांठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, ठाकरे शिवसेना सचिव व माजी खासदार विनायक राऊत, रासप नेते व माजी मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी आमदार वैभव नाईक, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा सौ. साक्षी वंजारे, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिंदे गटाचे देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर, फळबागायती संघटना अध्यक्ष आप्पा अनभवणे, अणुउर्जा अभ्यासक मंगेश सावंत, संघटनेचे अध्यक्ष काका ढोके, गणेश गावकर, किरण टेंबुलकर, दिनेश धुवाळी आदी उपस्थित होते. मेळाव्यासमोर संबोधताना राजु शेट्टी म्हणाले की, आंबा-काजू बागायतदार संघटना गेले ४ महिने विविध मार्गाने आंदोलने करून आंबा बागायतदारांना शासनाने हेक्टरी ५ लाख रूपये तर काजू बागायतदारांना हेक्टरी ३ लाख रूपये भरपाईपोटी मदत द्यावी अशी मागणी करीत आहे. मात्र शासनाने बागायतदारांना हेक्टरी २२ हजार ५०० अशी तुटपुंजी मदत जाहीर केली, तर काजू बागायतदारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून बागायतदारांची थट्टा केली. बागायतदारांच्या न्याय्य मागण्यांसाठी हे आंदोलन असून शासनाला ठेकेदारांना पोसण्यासाठी तिजोरी खाली करता येते. मात्र बागायतदारांना मजुरांच्या मजुरीपेक्षाही कमी भरपाई जाहीर करून त्यांची चेष्टा करीत आहेत. अणुऊर्जासारखे विनाशकारी प्रकल्प कोकणात आणून येथील नैसर्गिक साधनसंपत्ती संपविण्याचे काम सरकार करू पाहत आहे. येथील नेते कोकणचा कॅलिफोर्निया करू असे एकीकडे सांगत आहेत, तर असे विनाशकारी प्रकल्प आणून कोकणचे वाळवंट करण्याचे काम हे सरकार करीत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अदानी-अंबानी यांना पोसण्यासाठी व कोकणातील माणसांचा बळी देण्याचा निर्धार मोदी-फडणवीस यांनी केला आहे . मात्र हा विनाशकारी प्रकल्प होवू नये यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येवून जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामसभा, नगरपंचायत सभा या सभांमध्ये प्रकल्पविरोधी ठराव घेवून प्रकल्पविरोधी जनरेटा तयार करावा लागेल. कारण संपूर्ण कोकणच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. अणुउर्जा प्रकल्प हा धोकादायक असून या प्रकल्पामुळे येथील आंबा, काजू बागायती तसेच मत्स्यव्यवसाय या व्यवसायांना धोका आहे. येथे पर्यटनप्रकल्प असूनही ते बंद आहेत, ते सुरू करण्यासाठी शासन प्रयत्न करीत नाही. येथील पारंपारिक मच्छिमारांना न्याय नाही, मात्र एलईडी, परप्रांतीय नौकांची मच्छिमारी बंदी कालावधीतही जोरात सुरू असून त्यांच्याकडून लाखो रूपयांचे कमिशन सत्ताधारी नेते घेत आहेत. सत्ताधार्‍यांच्या आशिर्वादाने बेकायदेशीर मच्छिमारी सुरू आहे. मात्र अशा पध्दतीने सुरू असलेल्या मच्छिमारी नौका बुडवाव्या लागतील, असा इशारा शेट्टी यांनी दिला. येथिल आंबा बागायतदार, शेतकरी, मच्छिमार यांच्यावर अन्याय होत असेल तर छातीचा कोट करून उभे राहू. आपण येथे लोकांची माथी भडकविण्यासाठी आलो नसून त्यांना न्याय मिळावा यासाठी आलो आहोत. शेतकर्‍यांसाठी माझे सर्व आयुष्य मी समर्पित केले आहे. हिंदूचा कैवार घेवून फिरणार्‍या येथील सत्ताधारी नेत्यांनी बागायतदार मच्छिमार हेदेखिल हिंदूच आहेत. त्याचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्याकडेही लक्ष द्यावे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पापासून आपला विनाशकारी प्रकल्पविरोधी लढा सुरूच असून देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांच्या सांगण्यावरून देवगडमध्ये अणुऊर्जा प्रकल्प आणण्याचा घाट घातला आहे. हे प्रकल्प आधी येत नाहीत तर जमिनी खरेदी करणारे दलाल प्रथम येतात. या दलालांवर प्रथम बहिष्कार टाका. आंबा बागायतदार व काजू बागायतदार यांना त्यांचा मागणीनुसार भरपाई दिली नाही. मात्र हा राजा उदार झाला आणि अणुऊर्जासारखा करोडो रूपयांचा घातक प्रकल्प येथिल जनतेच्या माथी मारत आहे. घातक प्रकल्प आणण्यापेक्षा गारमेंटसारखे रोजगार उपलब्ध करून देणारे प्रकल्प का आणत नाही? विजयुर्गमध्ये मोठा गाजावजा करीत आणलेल्या रो-रो सेवेचे तिकीट ९ हजार तर विमानाचे तिकीट २८०० रूपये असे फसवे प्रकल्प पाण्यात बुडवा. यावेळी त्यांनी सत्ताधारी व राणेंवर जोरदार टीका केली. जीवात-जीव असेपर्यंत अणुऊर्जा प्रकल्प येथे होवू देणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

टाईम्स स्पेशल

राणे यांचा धसका घेवू नका. शासन बदलवून टाकणारी आम्ही माणसे आहोत. हे अदानी,अंबानी यांना विकले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा लबाड मुख्यमंत्री बघितला नाही. कसली राणे स्टाईल? सत्तेमध्ये आहात तुमच्यात खरी ताकद असेल तर प्रकल्प रद्द करा, असे आव्हान महादेव जानकर यांनी राणें यांना केले. अणुउर्जा प्रकल्पाच्या विरोधासाठी प.महाराष्ट्र, विदर्भ तुमच्या पाठीशी राहील. खंबीरपणे उभे राहू, प्रकल्पविरोधासाठी गावात चळवळ उभी करा असे आवाहन त्यांनी केले. राणे लोकांचा विश्वास गमावित चालले आहेत. एकीकडे बागायतदारांना तुटपुंजी मदत जाहीर केली आणि याचे श्रेय यांचे आमदार भाऊ घेत आहेत. तिन्हीही राणे जिल्ह्यात सत्तेत आहेत. त्यामुळे प्रकल्प होणार हा समज आपल्याला खोडून काढायचा आहे. लढाई सुरू झाली आहे. शिवसेनेची ताकद तुमच्या पाठीशी आहे. यावेळी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारे, संघटनेचे अध्यक्ष काका ढोके, गणेश गावकर, किरण टेंबुलकर यांनी विचार मांडले तर अणुउर्जा अभ्यासक मंगेश सावंत यांनी अणुउर्जा प्रकल्पाचे तोटे उपस्थितांसमोर मांडून या प्रकल्पाला ठाम विरोध करा असे आवाहन केले. या आंदोलनाला विविध संघटना, पर्यावरणवादी संघटना, काही राजकीय पक्षांनी पाठींबा दर्शविला होता. विविध संघटनांचे प्रतिनिधी, बागायतदार, शेतकरी, मच्छिमार, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर. आपत्कालीन यंत्रणेसह, महसुल, पोलीस यंत्रणा प्रकल्पस्थळी ठाण मांडून होती. पोलीस अधिक्षक मोहन दहिकर, प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्यासह शासकीय यंत्रणेतील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. मेळाव्यानंतर जलसमाधी आंदोलनासाठी जाणार्‍या आंदोलकांना रोखण्यासाठी मिठमुंबरी समुद्रकिनारी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून मानवी कडे तयार करण्यात आले होते. जलसमाधी आंदोलनासाठी जात असताना राजू शेट्टी, विनायक राऊत, महादेव जानकर, वैभव नाईक, साक्षी वंजारे, आदी प्रमुख नेत्यांना पोलिसांनी रोखले यावेळी पोलिस अधिक्षक मोहन दहिकर व प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी जलसमाधी आंदोलनस्थळी जावू नये असे आवाहन या नेत्यांना केले. यावेळी शेट्टी आणि राऊत यांनी आंदोलनकर्त्यांसमोर प्रशासनाच्या प्रमुख म्हणून आंदोलनकर्त्यांचा भावना जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी का उपस्थित राहील्या नाहीत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत त्यांचा निषेध केला.जोपर्यंत जिल्हाधिकारी आंदोलनकर्त्यांसमोर येत नाही तोपर्यंत हटणार नाही असा पवित्रा संघटनेचे अध्यक्ष काका ढोके यांनी घेतला. मात्र आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहचवुन याच अधिवेशनात या मागण्यांची पुर्तता शासनाने करावी अन्यथा आंदोलने सुरूच राहतील असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला व आंदोलन तात्पुरते स्थगित करावे असे आवाहन सर्व आंदोलनकर्त्यांना केले. प्रांताधिकारी कातकर यांनीही आपल्या भावना शासनापर्यंत पोहचवितो असे आश्वासन दिले. मात्र तरीही पोलिसांचे कडे तोडून व चकवा देवून १० ते १२ आंदोलनकर्त्यांनी पाण्यात प्रवेश करून सरकारविरोधी घोषणाबाजी केली.या आंदोलनकर्त्यांना नंतर पोलिसांनी ताब्यता घेतले.मिठमुंबरी समुद्रकिना्यावर या आंदोलनामूळे पुर्णत: पोलिस छावणीचे स्वरूप होते. शुक्रवारी दुपारी २ वाजता हे आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याचे राजू शेट्टी यांनी जाहीर केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसाद दुखंडे यांनी केले. यावेळी प्रशांत शिंदे, तुषार पाळेकर, अजय नाणेरकर, गणेश वाळके, शरद परब,चंदन मामघाडी आदी आंदोलनकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg