loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुख आगाराचा 'रामभरोसे' कारभार: प्रवाशांच्या नशिबी मोडक्या गाड्या आणि 'दे धक्का' प्रवास

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - एसटी महामंडळाकडून दिवसेंदिवस तिकीट दरांमध्ये वाढ केली जात आहे, परंतु प्रवाशांना मिळणारी सेवा मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहे. देवरुख आगाराच्या अनेक गाड्या अत्यंत मोडकळीस आलेल्या आणि नादुरुस्त अवस्थेत असून, प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सर्वसामान्यांची 'माऊली' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लालपरीची अवस्था आज स्वतःच दयनीय झाली आहे. ​देवरुख आगाराच्या गाड्यांची अंतर्गत अवस्था पाहिल्यास, प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या आसण तुटलेल्या आणि फाटलेल्या आहेत. खिडक्यांची तावदाने तुटलेली असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यातच सर्वात मोठा मनस्ताप म्हणजे या गाड्या कधी आणि कुठे बंद पडतील, याचा नेम उरलेला नाही. अनेकदा खेडेगावातील अंतर्गत मार्गांवर, रानावनात किंवा निर्जन रस्त्यांवर या गाड्या अचानक बंद पडतात. अशा वेळी रात्रीच्या वेळी लहान मुले, महिला आणि वृद्ध प्रवाशांचे जे हाल होतात, त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल प्रवाशांमधून विचारला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काही दिवसांपूर्वी देवरुख आगारातून लांब पल्ल्यासाठी सोडण्यात आलेली एक एसटी बस बाहेरून अतिशय चकाचक दिसत होती. मात्र, ही बस संगमेश्वर स्थानकात आली असताना अचानक एखाद्या बॉम्बचा आवाज व्हावा तसा प्रचंड आवाज होऊन गाडीच्या बॅटरीचा मोठा स्फ़ोट झाला. सुदैवाने ही घटना बस स्थानकात उभी असताना घडली; जर हा स्फोट चालत्या गाडीत किंवा गर्दीच्या घाटात झाला असता, तर मोठा अनर्थ ओढवला असता. या घटनेने एसटीच्या तांत्रिक देखभालीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.​गाडी रस्त्यात बंद पडल्यानंतर प्रवाशांना आणि काही वेळा चालक -वाहकांनाही गाडी सुरू करण्यासाठी 'दे धक्का' करावा लागतो. सोशल मीडियावर नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये प्रवाशांना भर रस्त्यात किंवा चिखलात गाडीला धक्का मारावा लागत आहे. यामध्ये त्या बिचाऱ्या चालक आणि वाहकांचा काय दोष? आगार प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे त्यांनाही प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागते आणि मानसिक मनस्ताप सहन करावा लागतो.

टाईम्स स्पेशल

नुकतेच राज्याचे परिवहन मंत्री यांनी मुंबईपासून ते कोकणातील विविध एसटी स्थानके आणि तेथील उपहारगृहांना अचानक भेटी दिल्या. काही ठिकाणची स्वच्छता पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले, तर काही ठिकाणी अस्वच्छता आणि दुरवस्था पाहून कडक भाषेत अधिकारिऱ्यांना सुनावले. मंत्र्यांचे हे पाऊल प्रवाशांच्या हितासाठी नक्कीच चांगले होते. परंतु, त्यांनी केवळ स्थानके आणि उपहारगृहे न पाहता, प्रत्येक स्थानकात उभ्या असलेल्या एसटी बसच्या तांत्रिक आणि अंतर्गत परिस्थितीकडेही लक्ष देणे गरजेचे होते. प्रवाशी किती खडतर, मोडक्या आणि खिळखिळ्या झालेल्या नादुरुस्त एसटीमधून प्रवास करत आहेत, हे त्यांनी जवळून पहायला हवे होते. तिकीट दरवाढ नियमित करणाऱ्या महामंडळाने प्रवाशांना सुरक्षित आणि समाधानकारक सेवा देणे बंधनकारक आहे. देवरुख आगाराने तातडीने आपल्या तांत्रिक विभागाची सुधारणा करावी आणि मार्गावर धावणाऱ्या गाड्या सुस्थितीत आहेत की नाही, याची खात्री करून प्रवाशांचा प्रवास सुखकर करावा, अशी आग्रही मागणी संपूर्ण तालुक्यातून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg