loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाचा तडाखा; अनेक भाग जलमय

संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - दापोली तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर रविवारी देखील कायम होता. सततच्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गिमव्हणे येथील गल्ली नंबर दोन या ठिकाणी शराफत बुरोंडकर यांचे घर असून त्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने त्यांची धावपळ उडाली. जलगाव येथील समर्थ नगर परिसरात पावसाचे पाणी घरांच्या आणि इमारतींच्या आवारात शिरण्यास सुरुवात झाली आहे. अनेक इमारतींच्या तळमजल्यांमध्ये तब्बल दोन ते तीन फूट पाणी साचल्याने रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काही घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे घरगुती साहित्याचेही नुकसान झाले आहे. केळसकर नाका परिसरातही मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्याचप्रमाणे सहरकर नगर, शराफत बुरोंडकर परिसर, गिम्हवणे गल्ली क्रमांक २ येथेही पाणी भरले असून शराफत बुरोंडकर यांच्या घरात पाणी शिरल्याने कुटुंबीयांची धावपळ उडाली. शहरातील काळकाई कोंड पुलाजवळील गुडलक स्टोअर समोरील परिसर, केळसकर नाका येथील स्टेट बँकेसमोरील रस्ता तसेच नशेमन कॉलनी मशिदीसमोरील भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. गटारे तुंबल्याने आणि पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी गटारांचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.

टाईम्स स्पेशल

सततच्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले असून काही ठिकाणी वाहनचालकांना वाहने सावकाश चालवावी लागत आहेत. सखल भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी दापोली नगरपंचायत आणि संबंधित प्रशासनाने तातडीने गटारांची साफसफाई करून पाणी निचर्‍याची व्यवस्था करावी, सखल भागातील पाणी त्वरित बाहेर काढावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg