loader
Breaking News
Breaking News
Foto

महाड-म्हाप्रळ रस्त्याची अवस्था बिकट; महामार्गाचे काम पूर्णत्वाला जाणार तरी कधी? स्थानिकांचा सवाल

चिंभावे (रघुनाथ भागवत) - राजेवाडी फाटा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव असलेले आंबडवे इथपर्यंतच्या सुरु असलेल्या दोन पदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली आठ वर्षे सुरू असून ते आजतागायत पूर्णत्वाला गेलेले नाही. या मार्गावरील महाड ते म्हाप्रळ रस्त्यादरम्यान पुलांच्या लगत आणि मोऱ्यांच्या ठिकाणी देखील दुरवस्था झाली असून वाहन चालकांसह नागरिकांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. महाड-म्हाप्रळ मार्गावर वराठी बौद्धवाडी येथे महामार्गाचे काम अपूर्ण असल्यामुळे त्याठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे चिखल निर्माण झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणावरुन वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्या ठिकाणी वाहने खचत असून वाहन चालकांना स्वतः खडी अथवा दगड टाकून वाहने पुढे नेण्याची कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर चिंभावे येथील पुलाजवळ पुलाच्या स्लॅब लगतच रस्त्याच्या मध्यभागी खड्डा पडला असून त्यातून धोका निर्माण झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ऑगस्ट २०१७ साली सावित्रीपुल उद्घाटन प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि रस्ते वाहतूक केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते राजेवाडी फाटा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव असलेले आंबडवे हा सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ता राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतर करून दोन पदरी महामार्गाचे भूमिपूजन करण्यात आले. २०१९ पर्यंत हा महामार्ग पूर्ण होईल असे असताना देखील आज २०२६ चा मध्यान संपला, तरी आजतागायत हा महामार्ग पूर्णत्वाला गेलेला नाही. आतापर्यंत महामार्गाच्या झालेल्या कामामध्ये देखील मोऱ्यांच्या ठिकाणी रस्ता खचला गेला असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. चिंभावे ते ओवळे काँक्रिटीकरण आणि ओवळे ते राजेवाडी फाट्यापर्यंत डांबरीकरण रस्ता पूर्ण झाला असला, तरी ठीकठिकाणी अजूनही मोऱ्या आणि साईट पट्टी तसेच गटारांची कामे बाकी असल्याचे पाहायला मिळत आहे. पुलांच्या दरम्यान अपूर्ण असलेला रस्त्याचे काम त्रासदायक ठरत आहे.

टाइम्स स्पेशल

त्याचबरोबर या मार्गावरील मुख्य असलेल्या रावढळ पुलाचे काम देखील आज तागायत रखडलेले आहे. अतिशय संथगतीने सुरू असलेल्या या महामार्गाचे काम गेली आठ वर्षे स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करायला लावलेला हा मार्ग म्हणावा लागेल. अनेक अपघाताच्या घटना घडून अनेकजण जखमी झाले आहेत. आता हा महामार्ग कधीपर्यंत पूर्ण होईल असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे. दरम्यान, वराठी बौद्धवाडी येथे रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे त्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहन चालकांना तिथून वाहन पुढे नेण्यासाठी केव्हा-केव्हा त्या ठिकाणी वाहन फसले जात असून दगड आणि खडी टाकून वाहन पुढे नेण्याची कसरत करावी लागत आहे. याची दखल घेऊन संबंधित राष्ट्रीय महामार्गाने त्वरित या महामार्गाचे काम पूर्णत्वाला नावे अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg