loader
Breaking News
Breaking News
Foto

तिलारीच्या ‘रॉक गार्डन’ला अवकळा : मोजतेय अखेरच्या घटका

तिलारी (प्रतिनिधी) - निसर्गसौंदर्याने नटलेल्या तिलारी परिसराची आणि पर्यटन विकासाची ’शान’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या येथील प्रसिद्ध ’रॉक गार्डन’ची आज अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. एकेकाळी पर्यटकांच्या आणि स्थानिक रहिवाशांच्या गर्दीने फुलून जाणारे हे उद्यान आज प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ओसाड पडले असून, त्याचे रूपांतर चक्क एका ’जंगलात’ झाले आहे. या ठिकाणी आता पर्यटकांच्या ऐवजी मद्यपी आणि समाजकंटकांचा वावर वाढल्याने संताप व्यक्त केला जात आहे. साधारण २००९ च्या सुमारास तिलारी धरणाचे काम पूर्ण होऊन धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास सुरुवात झाली. त्यावेळी धरण पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन, या परिसराचा विकास ’पर्यटन केंद्र’ म्हणून करण्यासाठी लाखो रुपये खर्चून या रॉक गार्डनची निर्मिती करण्यात आली होती. पर्यटकांना जंगलाच्या सानिध्यात आणि शांत वातावरणात निसर्गाचा आनंद घेता यावा, हे या गार्डनचे मुख्य उद्दिष्ट होते. मात्र, आज या उद्दिष्टाला पूर्णतः हरताळ फासला गेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सद्यस्थितीत रॉक गार्डन परिसरात नजर टाकताच मन विषण्ण होते. उद्यानात प्रवेश करताच मानभर वाढलेले गवत आणि काटेरी झुडपांचे साम्राज्य दिसते. जिथे एकेकाळी लहान मुलांचा किलबिलाट असायचा, तिथल्या घसरगुंडी, सी-सॉ आणि इतर खेळण्यांना गंज चढला आहे. ही खेळणी आता पूर्णपणे गवतात गडप झाली असून, ती वापरणे लहान मुलांसाठी धोकादायक ठरले आहे. उद्यानातील बैठक व्यवस्था आणि निवारा शेड यांच्या भोवतीही झुडपे वाढली असल्याने तिथे जाण्यासाठी रस्ताच उरलेला नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या सुंदर उद्यानाचा ताबा आता मद्यपींनी घेतल्याचे चित्र आहे. उद्यानाच्या परिसरात ठिकठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास आणि कचर्‍याचे ढिगारे पडलेले आहेत. नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी उभारलेल्या या वास्तूचा वापर आता अनैतिक गोष्टींसाठी होत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.

टाइम्स स्पेशल

तिलारी धरण आणि आजूबाजूचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी शासनाने येथे लाखो रुपये खर्च करून हे रॉक गार्डन उभारले होते. मात्र, उभारणीनंतर त्याच्या नियमित देखभालीकडे संबंधित विभागाने सोयीस्कर पाठ फिरवली आहे. त्यामुळे करदात्यांच्या पैशांचा असा अपव्यय का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.‘कोल्हापूर टुरिझम’च्या जुन्या माहितीनुसार आणि सध्याच्या वेबसाइटवरही हे गार्डन पर्यटकांसाठी खास डिझाइन केल्याचा दावा केला आहे. मात्र, वास्तवात परिस्थिती भीषण आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही, तर हे पर्यटन स्थळ कायमचे नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg