loader
Breaking News
Breaking News
Foto

महसूलमंत्री बावनकुळे यांच्या आढावा बैठकीदरम्यान प्रशासकीय वर्तुळात खळबळ, एका अधिकार्‍यावर तत्काल बडगा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेली आढावा बैठक प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून देणारी ठरली. बैठकीपूर्वी जनतेची निवेदने स्वीकारत नागरिकांच्या तीव्र तक्रारी ऐकून घेतल्यानंतर, मंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना अक्षरशः धारेवर धरले. वर्षानुवर्षे प्रकरणे प्रलंबित ठेवून सर्वसामान्य जनतेला हेलपाटे मारायला लावणार्‍या आणि भ्रष्टाचाराचा शिक्का बसलेल्या अधिकार्‍यांची कसलीही हयगय केली जाणार नाही, असा सज्जड दम त्यांनी भरला. या अत्यंत आक्रमक बैठकीत भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षक सोनल काळे यांच्या मनमानी कारभारावर तात्काळ बडगा उगारण्यात आला. त्यांच्याविरुद्धच्या तक्रारींची गंभीर दखल घेत महसूल मंत्र्यांनी अप्पर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांना थेट फोन लावून त्यांची आजच्या आज अमरावतीला बदली करण्याचे आदेश दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच, जिल्ह्यातील इतर उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांच्या कामकाजाचा अक्षरशः पाढा वाचण्यात आला. शुद्धलेखनाची किंवा टायपिंगची किरकोळ दुरुस्ती करण्यासाठी महिनान् महिने आणि वर्ष-वर्षे खटले किंवा फाईल्स पेंडिंग ठेवणार्‍या अधिकार्‍यांना मंत्र्यांनी चांगलेच खडसावले. तुम्ही काही न्यायालयाचे न्यायाधीश आहात का, जे सुनावणी आणि तारखांचे खेळखंडोबा चालवलेत, अशा शब्दांत त्यांनी अधिकार्‍यांची कानउघाडणी केली. जनतेची आणि शासनाची लूटमार तात्काळ थांबवा, असे स्पष्ट करत बावनकुळे म्हणाले की, एक अधिकारी तयार करण्यासाठी शासनाचा लाखो-कोटी रुपयांचा खर्च होतो, त्यामुळे जनतेचा पैसा आणि विश्वास गमावू नका. सकाळी घरापासून निघताना पिशव्या आणि डबे भरून पैसे गोळा करण्याचे दिवस आता संपले आहेत. हा हरामाचा पैसा कधीच उपयोगी पडत नाही. उद्या निलंबन झाल्यावर बायको-मुलांना आणि आई-वडिलांना काय तोंड दाखवणार? असा सज्जड सवाल त्यांनी अधिकार्‍यांना केला.

टाईम्स स्पेशल

जर भ्रष्टाचारात किंवा माफ़ियांसोबत संगनमत असल्याचे सिद्ध झाले, तर सीबीआय, इन्कम टॅक्स आणि ईडीच्या नजर तुमच्यावर असून कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यावर आणि अवैध वाळू उपशावरही या बैठकीत कडक भूमिका घेण्यात आली. यापुढे नैसर्गिक वाळूऐवजी एम-सँडच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याचे आणि वाळू धोरण पूर्णपणे माफिया-मुक्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अधिकार्‍यांनी केवळ एसी केबिनमध्ये न बसता दररोज दुपारी तीन ते पाच या वेळेत जनतेला भेटलेच पाहिजे आणि आठवड्यातून एकदा गावात जाऊन प्रत्यक्ष लोकांच्या समस्या सोडवाव्यात, असा आदेशही त्यांनी दिला. मंत्र्यांच्या या तडाख्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल आणि भूमि अभिलेख विभागाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg