loader
Breaking News
Breaking News
Foto

ताम्हिणी घाट २५ दिवसांपासून ठप्प; रायगडचे अर्थकारण आणि पर्यटन धोक्यात

संगलट (खेड)(इक्बाल जमादार) - पुणे-माणगाव-दिघी आंतरराष्ट्रीय बंदराला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा ताम्हिणी घाटमार्ग गेल्या 25 दिवसांपासून बंद असल्याने रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक व पर्यटन क्षेत्रावर गंभीर परिणाम झाला आहे. 5 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्याच्या हद्दीत रस्त्याचा काही भाग खचला, तर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मात्र, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अखत्यारीतील या मार्गाची दुरुस्ती अद्याप पूर्ण न झाल्याने नागरिक, विद्यार्थी, व्यापारी आणि पर्यटन व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सन 2001 मध्ये वाहतुकीसाठी खुला झालेला ताम्हिणी घाट मार्ग हा पुणे आणि कोकण यांना सर्वात कमी अंतरात जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो. पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील हजारो पर्यटक कोकणातील समुद्रकिनारे व धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. तसेच, दिघी आंतरराष्ट्रीय बंदराशी हा मार्ग जोडला गेल्याने त्याचे आर्थिक महत्त्वही वाढले आहे. औद्योगिक मालाची नेआण आणि शिक्षणासाठी पुण्यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा मार्ग अत्यंत उपयुक्त आहे. मात्र, सध्या रस्ता बंद असल्यामुळे प्रवाशांना खोपोली-लोणावळा मार्गे मोठा वळसा घालावा लागत असून वेळ आणि खर्च या दोन्हीत मोठी वाढ झाली आहे. ताम्हिणी घाट बंद झाल्याचा सर्वाधिक फटका रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला बसला आहे. ऐन पर्यटन हंगामात हॉटेल, रिसॉर्ट, होमस्टे, रेस्टॉरंट, पेट्रोलपंप आणि लघुउद्योजकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. पर्यटनावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांच्या उत्पन्नात घट झाल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, नुकत्याच गीता बाग येथे आयोजित एका कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांनी ताम्हिणी घाट बंद असल्याने रायगडमधील पर्यटन व्यवसायाचे प्रचंड नुकसान झाल्याची खंत व्यक्त केली. त्यांनी पुणे जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या 31 जुलैपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती खा. तटकरे यांनी नागरिकांना दिली. असे असले तरी, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करुन मार्ग तातडीने सुरु करावा, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg