loader
Breaking News
Breaking News
Foto

कै. प्रकाश डोईफोडे यांच्या स्मृतींना वृक्षारोपणातून भावपूर्ण श्रद्धांजली

वैभववाडी (प्रतिनिधी) - पोखरण येथील रहिवासी, मनमिळावू आणि सामाजिक जाणीव जपणारे कै. प्रकाश डोईफोडे यांचे अकाली निधन झाल्याने डोईफोडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या आठवणींनी सर्वांचे मन हेलावून गेले आहे. कै. प्रकाश डोईफोडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होताना दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्ग यांनी केवळ सांत्वनाचे शब्द न बोलता प्रत्यक्ष सामाजिक बांधिलकी जपत कुटुंबाला आधार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. कै. प्रकाश डोईफोडे यांचा मुलगा प्रितेश डोईफोडे याला दत्तक घेऊन त्याच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्गच्या वतीने स्वीकारण्यात आली आहे. या निर्णयातून ग्रुपने सामाजिक संवेदनशीलता आणि माणुसकीचा आदर्श निर्माण केला आहे. याचबरोबर कै. प्रकाश डोईफोडे यांच्या स्मृती कायमस्वरूपी जपल्या जाव्यात, त्यांच्या आठवणी पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांच्या जीवनाला निसर्गाशी जोडलेले चिरंतन स्मारक मिळावे, या भावनेतून त्यांच्या निवासस्थानी वृक्षारोपण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

"माणूस जातो, पण त्याच्या आठवणी कायम राहतात; आणि त्या आठवणींना जर एका वृक्षाचे रूप दिले, तर त्या पुढील अनेक पिढ्यांना सावली देतात," या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. आज लावण्यात आलेले हे रोपटे उद्या मोठे वृक्ष बनेल. त्याची हिरवीगार पाने, फांद्या आणि सावली कै. प्रकाश डोईफोडे यांच्या आठवणींची सतत जाणीव करून देतील. त्यामुळे हा केवळ वृक्षारोपणाचा कार्यक्रम नसून, एका प्रेमळ व्यक्तीच्या स्मृतींना जिवंत ठेवण्याचा आणि त्यांच्या आठवणींना चिरंतन करण्याचा भावनिक प्रयत्न असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कै. प्रकाश डोईफोडे यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर आलेल्या संकटाच्या काळात दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्गच्या वतीने कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली. दुःखाच्या प्रसंगी कुटुंबासोबत उभे राहणे, त्यांना मानसिक आधार देणे आणि शक्य त्या स्वरूपात मदतीचा हात पुढे करणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, प्रितेशच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय हा केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून, कै. प्रकाश डोईफोडे यांच्या कुटुंबाशी भावनिक नाते जोडण्याचा आणि त्यांच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी खंबीरपणे साथ देण्याचा संकल्प आहे.

टाईम्स स्पेशल

"एक व्यक्ती – एक वृक्ष – एक आठवण" या भावनेतून करण्यात आलेला हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक संवेदनशीलतेचा सुंदर संदेश देणारा ठरला आहे. एका व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ लावलेले हे झाड भविष्यात अनेकांना सावली, शुद्ध हवा आणि निसर्गाचा आनंद देईल, हीच या उपक्रमामागची खरी भावना आहे. यावेळी संस्थापक महादेव खरात, अध्यक्ष शेखर डोईफोडे, उपाध्यक्ष राजेश जानकर तसेच संचालक राजू ताटे, विनायक जंगले, दीपक येडगे, संदीप शिंगाडे, परशुराम लांबर यांच्यासह ग्रुपचे इतर सदस्य उपस्थित होते. कै. प्रकाश डोईफोडे यांचे आयुष्य अल्पकाळाचे ठरले असले तरी त्यांच्या आठवणी मात्र कायमस्वरूपी जिवंत राहाव्यात, यासाठी दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्गने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg