loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्यात डंपिंग ग्राउंडविरोधात स्वातंत्रदिनी कोत्रेवाडी ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण

लांजा (वार्ताहर) - वस्तीलगत नियमबाह्य पद्धतीने लादलेला घनकचरा (डम्पिंग ग्राउंड) प्रकल्प अन्य ठिकाणी करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी शहरातील कोत्रेवाडी ग्रामस्थांच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी लांजा तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन मंगळवारी २८ जुलै रोजी लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांना सादर करण्यात आले. दरम्यान, १४ ऑगस्ट २०२५ पासून सलग ९३ दिवस लांजा तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण करून देखील अद्यापही प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नसल्यामुळे प्रशासनाच्या गैरकारभाराविरोधात, नियमबाह्य प्रस्ताव व खरेदीखत करणार्‍या मुख्याधिकारी नगरपंचायत लांजा तसेच माजी नगराध्यक्ष यांची खातेनिहाय सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोत्रेवाडी वस्तीजवळ घनकचरा प्रकल्पासाठी (डम्पिंग ग्राउंड) प्रस्तावित केलेली जागा व त्या जागेसाठी घेण्यात आलेला प्रस्ताव हा मुळातच चुकीचा आहे. प्रस्तावात अनेक त्रुटी असून शासनाच्या कोणत्याही निकषात बसत नसताना देखील ही जागा, अटी शर्तींचे उल्लंघन करून घेतलेली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर प्रस्तावित क्षेपण भूमी जागेची शासनाच्या जिल्हा कमिटीने प्रत्यक्ष पाहणी करून घनकचरा नियम २०१६ च्या निकषात बसत नसल्याने प्रस्ताव अयोग्य ठरविलेला आहे. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या निर्देशानुसार प्रभारी जिल्हा प्रशासन अधिकारी तुषार बाबर यांनी तसे पत्र मुख्याधिकारी लांजा यांना दि. १७ फेब्रुवारी २०२१ रोजी दिलेले आहे. त्या पत्राच्या अनुषंगाने मुख्याधिकारी नगरपंचायत लांजा यांनी दि. २६ मार्च २०२१ रोजीच्या पत्रान्वये कोत्रेवाडी ग्रामस्थांना लेखी पत्र दिलेले आहे. त्या पत्रामध्ये सदर प्रस्ताव रद्द झाल्याचे स्पष्ट नमूद आहे. तरीही प्रशासनाने पुन्हा तोच नियमबाह्य प्रस्ताव घेऊन चुकीच्या पद्धतीने अहवाल सादर करून शासनाची दिशाभूल केलेली आहे. शासनाच्या नियमानुसार कचरा गोळा करून लोकवस्ती पासून दूर अंतरावर त्याचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावण्याचे धोरण असताना लांजा नगरपंचायत मात्र कोत्रेवाडी वस्तीलगत नियमबाह्य जागा घेऊन त्याच ठिकाणी डम्पिंग ग्राउंड करण्याचा अट्टाहास का करत आहे? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

टाईम्स स्पेशल

प्रशासनाने शासनाच्या स्वच्छ अभियानाचा सखोल विचार करून कोत्रेवाडी वस्तीजवळ होणारा कचरा प्रकल्प आरोग्यास हानिकारक असल्याने तो अन्य ठिकाणी लोकवस्ती पासून दूर करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कोत्रेवाडी येथील नियोजित जागेला रस्ता नसताना, प्रस्ताव रद्द असतानाही नियोजित जागेचे प्रस्ताव व खरेदी खत करणार्‍या संबंधित मुख्याधिकारी त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष यांची खातेनिहाय चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील या निवेदनात ग्रामस्थांनी केली आहे. यापूर्वी कोत्रेवाडी ग्रामस्थांनी प्रशासनाच्या विरोधात लांजा तहसील कार्यालयासमोर ९३ दिवस साखळी उपोषण केले होते. तरी दखील आम्हाला न्याय मिळत नसेल तर नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात लोकशाही मार्गाने पुढील टोकाचे पाऊल उचलावेच लागेल आणि त्याला सर्वस्वी प्रशासनाचे संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा ग्रामस्थांनी या निवेदनात दिला आहे. सदरचे निवेदन लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांच्यासह लांजा पोलीस ठाणे, लांजा नगरपंचायत यांना देखील सादर करण्यात आले आहे. यावेळी मंगेश आंबेकर, संतोष कोत्रे, सतीश पेडणेकर, अनिल शिंदे, विलास खामकर आदींसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg