loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील कोकणनगरमध्ये रेशन माफियाला मोठा दणका!

रत्नागिरी:रत्नागिरी शहरातील कोकणनगर परिसरातील शासकीय रास्त धान्य दुकानात गेल्या अनेक महिन्यांपासून चाललेल्या कथित अनागोंदी कारभाराचा आणि मनमानीचा अखेर कडेलोट झाला आहे. हक्काचे धान्य मिळवण्यासाठी तासनतास तीव्र उन्हात व पावसात ताटकळत उभे राहूनही नागरिकांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागत होते. दुकान चालकाच्या या अरेरावी आणि बेजबाबदार वृत्तीविरोधात संतप्त नागरिकांच्या असंतोषाचा आज अखेर उद्रेक झाला. या प्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने अत्यंत वेगाने हालचाली करत थेट घटनास्थळी धाव घेतली आणि प्राथमिक चौकशीअंती तक्रारींमध्ये तथ्य आढळल्याने संबंधित रेशन दुकान अखेर 'सीलबंद' (Seal) करण्यात आले. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकणनगर येथील रास्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्याबाबत आणि दुकान चालकाच्या वागणुकीबाबत स्थानिक रेशनकार्डधारकांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र असंतोष खदखडत होता. दरमहा मिळणारे धान्य वेळेवर न देणे, धान्याचा तुटवडा दाखवून सर्वसामान्यांची अडवणूक करणे आणि विचारणा केल्यास उद्धटपणे उत्तरे देणे असे प्रकार नियमित घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. आज सकाळी धान्यासाठी जमा झालेल्या नागरिकांचा संयम सुटला आणि त्यांनी दुकानासमोर एकत्र येत जोरदार निदर्शने सुरू केली. हक्काचे रेशन मिळेपर्यंत माघार घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला.​नागरिकांच्या या तीव्र आक्रोशाची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक केतन उमेश शेट्ये आणि नगरसेविका फौजिया तनवीर मुजावर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सर्वसामान्य, कामगार व गरीब कुटुंबांची होणारी ससेहोलपट आणि मानसिक-आर्थिक मनस्ताप पाहून दोन्ही नगरसेवकांनी या समस्येचे गांभीर्य ओळखले. त्यांनी तात्काळ रत्नागिरी पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. नगरसेवकांच्या या आक्रमक भूमिकेनंतर पुरवठा विभाग तात्काळ हरकतीत आला.​लोकप्रतिनिधींच्या आक्रमक पाठपुराव्यानंतर पुरवठा अधिकारी सायली चव्हाण आणि अधिकारी निशा पाईकराव यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथक काही वेळातच कोकणनगर येथील रेशन दुकानावर पोहोचले. अधिकाऱ्यांचे पथक दाखल होताच संतप्त नागरिकांनी दुकान चालक सचिन गोठणकर यांच्याविरोधात तक्रारींचा पाढाच वाचला.

टाइम्स स्पेशल

​नागरिकांनी पुरवठा अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी नोंदवताना सांगितले की, दुकानातून एकाच वेळी पूर्ण महिन्याचे धान्य कधीच दिले जात नाही. कधी केवळ गहू दिले जातात तर तांदळासाठी काही दिवसांनी येण्यास सांगितले जाते, तर कधी तांदूळ देऊन गव्हासाठी चकरा मारायला लावल्या जातात. अवघ्या एका महिन्याच्या रेशनसाठी प्रत्येक कुटुंबाला किमान ५ ते ६ वेळा दुकानाच्या फेऱ्या माराव्या लागतात. रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांचा यात पूर्ण दिवस वाया जातो. याशिवाय, धान्याची विचारणा केल्यावर मिळणारी अरेरावीची वागणूक आणि वितरणातील सततचा गोंधळ यामुळे नागरिक पूर्णपणे त्रासले होते.​नागरिकांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घेतल्यानंतर आणि दुकानातील प्राथमिक पाहणी व तपासणीदरम्यान धान्याचा तुटवडा व वितरणातील गंभीर अनियमितता स्पष्ट झाल्याने पुरवठा अधिकारी सायली चव्हाण आणि निशा पाईकराव यांनी कसलाही उशीर न करता धडक निर्णय घेतला. पुरवठा विभागाच्या पथकाने सर्व नियमांचे पालन करत कोकणनगर येथील ते रास्त धान्य दुकान तात्काळ 'सीलबंद' केले. रेशन वितरणात अनियमितता आणि बेकायदेशीर प्रकार करणाऱ्या तत्त्वांना हा प्रशासनाकडून देण्यात आलेला एक मोठा इशारा मानला जात आहे. नगरसेवक केतन उमेश शेट्ये म्हणाले की, "सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांच्या हक्काच्या धान्यावर मारला जाणारा दल्ला किंवा त्यांना साध्या रेशनसाठी वेठीस धरण्याचा कोणताही प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही. रेशन दुकानदारांची अरेरावी आणि अनियमितता रोखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. केवळ दुकान सीलबंद करून ही लढाई थांबणार नाही, तर या प्रकरणातील दोषींवर कायद्यानुसार कडक कारवाई होईपर्यंत आणि परिसरातील रेशन वितरण व्यवस्था पूर्ववत सुरळीत होईपर्यंत आमचा पाठपुरावा असाच चालू राहील."

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg