loader
Breaking News
Breaking News
Foto

‘दिव्याखाली अंधार!’ नगरपरिषदेच्या कामाचा नगरपरिषदेच्याच वाहनाला फटका; रस्ता कामातील चरात टँकर रुतला; प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांचा संताप

रत्नागिरी(जमीर खलफे)- ‘दुसर्‍यासाठी खड्डा खणला की, स्वतःच त्यात पडतो’, या म्हणीचा प्रत्यय नुकताच रत्नागिरी शहरात पाहायला मिळाला आहे. नगरपरिषदेतर्फे सध्या शहरात ठिकठिकाणी रस्ते आणि विविध नागरी सुविधांची कामे सुरू आहेत. मात्र, याच अपुर्‍या आणि निष्काळजीपणे केलेल्या कामांचा थेट फटका खुद्द नगरपरिषदेच्याच वाहनाला बसल्याची एक अजब घटना समोर आली आहे. नगरपरिषदेचा मैलावाहक टँकर रस्त्याच्या बाजूला खणलेल्या चरात जाऊन रुतल्याने प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचे पितळ उघडे पडले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी नगरपरिषद हद्दीत गेल्या काही दिवसांपासून विविध वाहिन्या आणि रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी खोदकाम करण्यात आले आहे. या कामांनंतर रस्त्यांच्या कडेला पडलेले खड्डे आणि उघडे चर योग्य प्रकारे न बुजवल्याने वाहनधारकांसाठी मोठे धोके निर्माण झाले आहेत. अशातच, मैलावाहक टँकर शासकीय रुग्णालयाच्या मार्गावरून जात असताना, रस्त्याच्या कडेला खणलेल्या आणि मातीने अर्धवट बुजवलेल्या चराचा अंदाज चालकाला आला नाही. त्यामुळे टँकरचे एक चाक थेट या चरात घुसले आणि गाडी तिथेच रुतून बसली. टँकर अत्यंत जड असल्याने आणि माती खचल्यामुळे वाहन बाहेर काढताना चालकाची मोठी कसरत झाली. या घटनेमुळे काही काळ परिसरातील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीला धाव घेत टँकर बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र, पालिकेच्याच निष्काळजीपणामुळे त्यांच्या स्वतःच्या वाहनाची ही अवस्था झाली असल्याचे पाहून प्रत्यक्षदर्शींनी आश्चर्य आणि संताप व्यक्त केला.

टाइम्स स्पेशल

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमधून नगरपरिषदेच्या कामाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरात खोदून ठेवलेले रस्ते आणि उघडे चर यामुळे रोजच छोटे-मोठे अपघात होत असतात. आम्ही वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत होते. मात्र आज स्वतः नगरपरिषदेचेच वाहन या निष्काळजीपणाचा बळी ठरल्याने पालिकेला आता तरी जाग येईल का? असा थेट सवाल स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसांत रस्ते खोदणे आणि ते पूर्ववत न करता तसेच उघडे सोडणे ही पालिका प्रशासनाची सवय झाली आहे. आज सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा मोठा अपघात घडला नाही, परंतु जर एखादा दुचाकीस्वार अथवा पादचारी या चरात पडला असता तर त्याला गंभीर दुखापत झाली असती. त्यामुळे नगरपरिषदेने या घटनेतून धडा घेऊन शहरातील सर्व उघडे चर आणि खड्डे तात्काळ योग्य पद्धतीने बुजवावेत, अशी मागणी आता रत्नागिरीकरांमधून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg