loader
Breaking News
Breaking News
Foto

राजीवडा ब्रेकवॉटर प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू, पालकमंत्री उदय सामंत यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

रत्नागिरी: रत्नागिरीच्या पर्यटन आणि मच्छीमारी क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या राजीवडा येथील ब्रेकवॉटर वॉल (बंधारा) आणि खाडीतील गाळ काढण्याच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी या कार्यस्थळाला भेट देऊन सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी त्यांनी कामाचा दर्जा आणि गतीबद्दल समाधान व्यक्त करत 'निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर' कंपनीला आवश्यक त्या महत्त्वपूर्ण सूचना केल्या. विशेष म्हणजे, हा भव्य बंधारा पूर्ण झाल्यानंतर या परिसरातून थेट 'सी-प्लेन' (Sea Plane) सेवा सुरू करण्याच्या हालचाली शासनाने सुरू केल्या असून, यामुळे रत्नागिरीच्या शिरपेचात पर्यटनाचा एक नवा तुरा रोवला जाणार आहे. ​रत्नागिरी जिल्ह्यातील राजीवडा, जुवे, सोमेश्वर, भाट्ये, कर्ला आणि फणसोप ही गावे भाट्ये खाडीच्या किनाऱ्यावर वसलेली असून येथील स्थानिक नागरिकांचा मुख्य व्यवसाय मच्छीमारी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या अनेक वर्षांपासून भाट्ये खाडीच्या मुखाशी मोठ्या प्रमाणात वाळूचा सँडबार म्हणजेच गाळ साचल्यामुळे मच्छीमार बांधवांना नौकावहन करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. ओहोटीच्या वेळी खाडीमुखातून नौका नेताना अपघात होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली होती. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्थानिक मच्छीमार आणि लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी बंधारा बांधण्याची मागणी केली होती. मच्छीमारांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाची दखल घेत शासनाने तब्बल १४३ कोटी ९६ लाख ८१ हजार ३५५ रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. ​या प्रकल्पांतर्गत खाडीच्या मुखावर १०१६ मीटर लांबीची भव्य ब्रेकवॉटर वॉल (ग्रोयन्स टाईप बंधारा) बांधण्यात येत आहे, तसेच खाडीतील नौवहन मार्गातील गाळ काढण्यात येत आहे. सध्या 'निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर' कंपनीमार्फत या बंधाऱ्याचे काम अहोरात्र सुरू आहे. आतापर्यंत या १०१६ मीटरपैकी अंदाजे ४०० मीटर लांबीच्या दगडी बंधाऱ्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.

टाईम्स स्पेशल

पावसाळ्याचा कालावधी धरून २४ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, पर्यावरण विषयक सर्व परवानग्या मिळाल्यानंतर कामाला गती आली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी या कामाची बारकाईने पाहणी केली आणि पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त काम सुरक्षितपणे पूर्ण करण्याचे आदेश दिले. ​हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर खाडीपात्रात गाळ साचण्याची प्रक्रिया कायमची थांबणार असून, मच्छीमार नौकांना भरती-ओहोटीच्या काळातही बंदरात सुरक्षितपणे ये-जा करणे सुलभ होईल. किनारपट्टीचे संवर्धन आणि मासेमारीला सुरक्षितता देणाऱ्या या प्रकल्पामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. त्यातच आता या बंधाऱ्याच्या परिसरातून 'सी-प्लेन' सेवा सुरू करण्याचे नियोजन असल्याने, देश-विदेशातील पर्यटक रत्नागिरीकडे आकर्षित होतील. साहजिकच यामुळे पर्यटन व्यवसायात मोठी वाढ होऊन स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या अभूतपूर्व संधी निर्माण होणार आहेत. देशातील एक आदर्श बंदर आणि पर्यटन केंद्र म्हणून रत्नागिरी नावारूपास येण्यास या प्रकल्पामुळे मोठी मदत होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg